भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, आयपीएल बायो-बबलमध्ये होत असल्याने ही स्पर्धा पूर्ण होऊ शकेल असा बीसीसीआयला विश्वास होता. मात्र, त्यांनी खबरदारी घेतल्यानंतरही कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केला. त्यामुळे बीसीसीआय आणि गव्हर्निंग कौन्सिलला मिळून आयपीएलचा उर्वरित मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला आहे. परंतु, भारतात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती असल्याने बऱ्याच देशांनी भारतातून येणारी हवाई वाहतूक स्थगित केली आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंना त्यांच्या घरी कसे पाठवायचे? हा बीसीसीआयपुढे प्रश्न आहे. मात्र, आम्ही यावर मार्ग शोधून काढतील, असा आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांना विश्वास आहे.
परदेशी खेळाडूंना चिंता
आम्ही परदेशी खेळाडूंना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी मार्ग शोधून काढू. ते सुखरूप आणि सुरक्षितरित्या त्यांच्या मायदेशी पोहोचतील, असे ब्रिजेश पटेल म्हणाले. ऑस्ट्रेलियासह बऱ्याच देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आपण मायदेशी कसे परतणार? अशी काही परदेशी खेळाडूंना चिंता असल्याचे समजते. यंदाच्या आयपीएल सर्वाधिक १४ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सहभागी झाले होते. त्यापैकी केन रिचर्डसन, झॅम्पा आणि अँड्र्यू टाय या खेळाडूंनी आधीच माघार घेत ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला होता.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने संघांशी संपर्क साधला
तसेच आयपीएलमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे ११-११, तर न्यूझीलंडचे १०, वेस्ट इंडिजचे ९, अफगाणिस्तानचे तीन आणि बांगलादेशचे दोन खेळाडू खेळत होते. त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची बीसीसीआयने याआधीच जबाबदारी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सुरक्षित मायदेशी पोहोचावेत यासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आठही संघांशी संपर्क साधला आहे.