राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग निवास स्थानाबाहेरी खर्डा भाकरी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. उजनी पाणी प्रश्नाचे राजकारण तापल्याने शेतकऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गोविंद बाग निवास्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. बारामती पोलिसांनी सोलापुरच्या २ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले होते. यशवंतराव उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचं शरद पवार यांच्या स्वीय सहायकांशी चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या स्वीय सहायकांनी आंदोलकांची चर्चा घडवून आणल्यानंतर आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश ढावण यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांच्याशी चर्चा करुन दिली. राऊत यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन शरद पवार यांच्याशी चर्चा करु असे आश्वासन दिले आहे. तसेच आमचे निवेदन फॅक्स करण्यास सांगितले असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.
यशवंतराव उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव महेश पवार आणि नागेश कळसे हे दोन शेतकरी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजनीच्या ५ टीएमसी पाण्यासंदर्भात शरद पवार याच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार दोन शेतकऱ्यांना माळेगाव येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना पोलिस स्टेशनला आणल्यानंतर बीपी अॅक्ट ६८ प्रमाणे ताब्यात घेऊन २ ते अडीच तास बसवल्यानंतर १४९ ची नोटीस देऊन बीपीअॅक्ट ६९ नुसार सोडण्या आले आहे. तसेच त्यांचे निवेदन स्विकारले असून तहसिलदारांमार्फत प्रशासनाला देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
काय आहे उजनी पाणी प्रकरण
उजनी धरणाच्या ५ टीएमसी पाण्यावरुन शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. सांडपाणी योजनेंअंतर्गत उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सोलापूरचे पाणी इंदापूरला न देण्याचा आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे फक्त तोंडी सांगितले होते. परंतु अद्याप तसे पत्रक जारी करण्यात आले नाही. यामुळे तो निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी सोलापूरच्या शेतकऱ्यांनी केली आहे. निर्णय रद्द न केल्यास शरद पवारांच्या गोविंद बाग निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून गोविंद बाग निवासस्थानाची सुरक्षा वाढवली आहे.