महाराष्ट्रात काही भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्याने लोकांची आणि वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी ४७७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारी हा आकडा १८४ पर्यंत घसरला होता. परंतु, मंगळवारी हा आकडा पुन्हा वाढलेला दिसला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९६ हजार १९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार १२३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले.
२ लाख ३० हजार ६८१ अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात १४ हजार १२३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ६१ हजार ०१५ वर पोहोचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ६८१ झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५२,७७,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,६१,०१५ (१६.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,६८,११९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ९,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
३५ हजारहून अधिक रुग्ण बरे
राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,३१,३१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.२८ टक्के एवढे झाले आहे.