टी-२० विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. सोबतच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या जीवनातील एका अविस्मरणीय अध्यायाची देखील सांगता झाली आहे. विराट कोहली आता टी-२० च्या कोणत्याच मालिकेत अथवा सामन्यात कर्णधार पदाचा कारभार सांभाळताना दिसणार नाही. सोमवारी झालेल्या नामिबियाविरूध्दच्या सामन्यानंतर कोहलीने आपल्या कर्णधार पदाबाबत आणि टी-२० विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीबाबत भाष्य केले. टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडल्यावर काय वाटते आहे यावर कोहलीने सांगितले की, “सर्वात पहिली ही आनंदाची बाब आहे. हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आहे आणि आम्हाला प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. कामाचा ताणतणाव लक्षात घेता त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा सर्वात चांगला क्षण होता. मागील ६-७ वर्षांपासून सलग क्रिकेट चालू होते.
विराट कोहलीने आणखी म्हटले की, “एक संघ म्हणून आम्ही चांगली खेळी केली आहे. जरी आम्ही चालू विश्वचषकात पुढे जाऊ शकलो नसलो तरी टी-२० मध्ये चांगले निकाल दिले आहेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन चांगली कामगिरी केली आहे. सुरूवातीच्या २ सामन्यांत जर त्या २ षटकांत चांगले प्रदर्शन करता आले असते तर आता भारतीय संघाचे गुणतालिकेतील स्थान वेगळ्या ठिकाणी असते.
जेव्हा विराट कोहलीला हा प्रश्न विचारला की, आता पण फिल्डवर कर्णधार पदाच्या उत्साहात पहायला मिळणार का? यावर कोहलीने सांगितले “ते कधीच बदलणार नाही. जर मी तसे करू शकलो नाही तर मी आणखी क्रिकेट खेळू शकत नाही. जेव्हा मी कर्णधार नव्हतो तेव्हा देखील मी त्याच उत्साहात खेळत होतो. मी फक्त उभा राहून काही करू शकत नाही”. असे कोहलीने सांगितले.
कोहलीने हेदेखील सांगितले की नामिबियाविरूध्दच्या सामन्यात फलंदाजी का नाही केली. विराटने म्हटले सुर्यकुमार यादवला चालू हंगामात जास्त फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. प्रत्येक युवा खेळाडूला आपला हंगाम चांगल्या आठवणीने समाप्त व्हावा असे वाटत असते. कारण की तो चांगल्या आठवणी सोबत घेऊन जाऊ शकेल. यामुळे योग्य होते की त्यानेच फलंदाजीसाठी जाणे.
लक्षणीय बाब म्हणजे टी-२० आंतरारष्ट्रीय मध्ये कोहलीने एकूण ५० सामन्यांमध्ये कर्णधार पद सांभाळले आहे. विश्वचषकाच्या अगोदरच कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. विराट कोहली नंतर रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनू शकतो.