उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणूकांचे जोरदार वारे वाहत आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशातील बहुचर्चित हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेस पक्षाकडून पीडितेच्या भावाला निवडणूकीचे तिकीट दिली जाऊ शकते. मात्र त्यांच्या संपूर्ण परिवाराचा याला विरोध आहे. पीडितेच्या भावाने देखील निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला आहे. हे हाथरस प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. त्यामुळे पीडितेला जोवर न्याय मिळत नाही तोवर तिचे कुटुंबीय निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नाही असे पीडितेच्या कुटुंबाने म्हटले आहे. याआधी देखील पीडितेच्या वहिनीला आणि आईला काँग्रेसकडून निवडणूकीचे तिकीट ऑफर करण्यात आले होते. मात्र त्यांनी ही विनम्रपणे त्यांची ऑफर नाकारली होती.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश निवडणूकांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला निवडणूकीचे तिकीट देण्यात आले होते. खरंतर हाथरसची घटना घडल्यापासून पीडितेचे कुटुंबीय निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू होत्या. ‘लडकी हू लड सकती हू’ असे नारे देत निवडणूका लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाने हाथरस पीडितेच्या कुटुंबातील महिला सदस्यांना निवडणूकीत उतरवण्याचे आवाहन केले मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी याला साफ नकार दिला आहे. पीडितेला न्याय मिळत नाही तोवर निवडणूकीत उतरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी एबीपी न्यूजला पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी असे म्हटले आहे की, ‘आम्ही सर्व राजकीय पक्षाचा सन्मान करतो. परंतु आज आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. आमचे पूर्ण लक्ष सध्या या केसमध्ये आहे. आम्हाला फक्त आणि फक्त न्याय हवा आहे. जोवर आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही कोणत्याही पक्षाचा कधीच विचार करणार नाही’. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांनी निवडणूकीत सहभाग घेण्यास पूर्णपणे नकार दिला असल्याने काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष चंद्रगुप्त विक्रमादित्यांनी याविषयी विचारले असता त्यांनी कोणतेही वक्तव्य करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.