शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ३४ आमदारांच्या सहीचे पत्र विधान मंडळाला दिले असून त्यावर आमदारांनी केलेल्या सह्या खर्या आहेत का ते आपण तपासणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नवे गटनेते म्हणून अजय चौधरी यांना आपण मान्यता दिल्याचे झिरवळ यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे गेल्यानंतर शिवसेनेचे गटनेते आपणच असल्याचा दावा एका पत्राद्वारे केला आहे. तसेच शिवसेना मुख्य प्रतोदपदावरून सुनील प्रभू यांची हाकालपट्टी करत त्या ठिकाणी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचे पत्र शिंदे यांनी नरहरी झिरवळ यांना दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे गटनेता आणि मुख्य प्रतोद कोण? तसेच शिंदे यांनी दिलेल्या पत्राचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी पत्रकारांशी बोलताना झिरवळ म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटाने मला पाठवलेल्या ठरावाच्या पत्रावर ३४ आमदारांच्या सह्या आहेत, परंतु शिवसेनेच्या आमदारांची संख्या स्थिर नाही. त्यामुळे हे पत्र जरी खरे असले तरी त्याची सत्यता मला तपासावी लागेल. आमदार नितीन देशमुख यांनी दावा केला आहे की मी इंग्रजीत स्वाक्षरी करतो, परंतु ठराव पत्रावर मराठीत स्वाक्षरी आहे. या ठरावावर उपस्थित सर्व आमदारांनी स्वाक्षरी केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे, परंतु त्या ठरावावर माझी सही नसल्याचे नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. इतर आमदारांचेही असेच काही आहे का तेही तपासून पाहावे लागणार आहे.
मुख्य प्रतोदची नियुक्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा तो पक्षाचा गटनेता असेल. सध्या अन्य नेत्यांचा गट अस्तित्वात आहे की नाही हे स्पष्ट नाही. नियम पुस्तिकेनुसार फक्त पक्षाचे अध्यक्ष गटनेते नियुक्त करू शकतात. गटनेत्याच्या नियुक्तीसाठी सर्व आमदारांनी उपस्थित राहणे आवश्यक नाही. उद्धव ठाकरे यांनी कायद्यानुसार त्यांच्या पक्षाचा नवीन गटनेता नेमण्यासाठी मला पत्र दिले आहे. म्हणून मी त्यांचा विचार केला, असे सांगत झिरवळ यांनी सध्या तरी आमदार अजय चौधरी गटनेते आणि सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद असल्याचे सांगितले.
आमदारांना एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यास भाग पाडले जात असल्याच्या चर्चांवर झिरवळ म्हणाले की, आमदारांना गुवाहाटीत राहण्यास भाग पाडले जात असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही, मात्र स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी आहेत. त्यांची चौकशी केली जाईल. त्यांना बळजबरीने नेले आहे का यावर मी भाष्य करू शकत नाही.
शिंदे गटाच्या पत्राबाबत साशंकता
दरम्यान, विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार हा पक्षप्रमुख आणि पक्षाने नेमलेले पदाधिकारी यांना असतो. त्यामुळे गुवाहाटीत एकनाथ शिंदे गटाने जी बैठक बोलावली आणि त्या बैठकीत नवा मुख्य प्रतोद नेमण्याचा जो निर्णय झाला त्याला कायदेशीर असा आधार नाही. यावर न्यायालयीन लढाई होऊ शकेल, मात्र तूर्त सुनील प्रभू हे शिवसेनेचे मुख्य प्रतोद असून त्यांचाच व्हीप शिवसेना आमदारांना लागू राहील, अशी माहिती विधान मंडळाच्या सूत्रांनी दिली.