पटणा : भाजपसोबतची युती तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पाच वर्षांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरजेडी-काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत संयुक्त बैठक घेतल्यानंतर, नितीश कुमार यांनी नवीन सरकारच्या स्थापनेसाठी राज्यपाल फागू चौहान यांना 164 आमदारांचे समर्थन पत्र सादर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार बुधवारी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
तेजस्वी यादवांची भाजपवर टीका –
राजभवनात महाआघाडीचे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप आपल्या मित्र पक्षांना नष्ट करते. पंजाब आणि महाराष्ट्रात काय झाले ते सर्वांनी पाहिले आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारला विशेष दर्जा मिळाला नाही. नितीश कुमार यांनी ही मागणी पंतप्रधान मोदींसमोर ठेवली. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. आज भाजप वगळता बिहारमधील सर्व पक्षांनी नितीशकुमार यांना आपला नेता मानले आहे.
नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का, असा प्रश्न तेजस्वी यादव यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, हा निर्णय मी मुख्यमंत्र्यांवर सोडतो. ते म्हणाले की, नितीशकुमार हे आजच्या काळात सर्वात अनुभवी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी काम केले आहे. आज देशातील वातावरण बिघडवले जात आहे आणि अशा वेळी नितीश कुमार यांनी निर्भयपणे निर्णय घेतल्याचेही तेजस्वी म्हणाले. नितीश कुमार यांचे हे पाऊल बिहारच्या जनतेच्या हिताचे आहे. त्याचवेळी नितीश कुमार म्हणाले की, बिहारमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मला वाईट वाटले. आमच्या खासदार आणि आमदारांनी एनडीएपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मी राजीनामा दिला.