ना खाऊंगा, ना खाने दूँगा असं म्हणत सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजप पक्षामध्येच असे खाणारे, खाऊ देणारे, खाऊ घालणारे आणि खायला लावणारे असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यांच्यावर अजूनही खटले देखील सुरू आहेत. मात्र, आता त्याचंच एक ताजं उदाहरण पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालं आहे. एकीकडे ममता बॅनर्जी विरूद्ध सीबीआय असा वाद सुरू असतानाच आता पश्चिम बंगालमध्येच नवी धुमश्चक्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे. माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि विशेष म्हणजे मी ममता बॅनर्जी यांनी चोख प्रत्युत्तर देणार, अशी भीमगर्जना करत त्यांनी शड्डू ठोकले आहेत. मात्र, घोष यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होऊ लागली आहे.
This is how BJP fights corruption. 2.5 cr cash was found in a CBI raid against IPS officer Bharati Ghosh in 2018 and in 2019 Bharati Ghosh joins BJP pic.twitter.com/a34JcWcSdb
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 5, 2019
ममता बॅनर्जींचा घेणार बदला?
सोमवारी भारती घोष यांनी दिल्लीमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात भाजपप्रवेश केला आणि त्यांच्याविषयीच्या चर्चांना ऊत आला. कारण कधीकाळी ममता बॅनर्जी यांच्या मर्जीतल्या अधिकारी म्हणून ओळख असलेल्या भारती घोष आता ममता बॅनर्जी यांचाच बदला घ्यायची भाषा करत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. २०१८मध्ये घोष यांच्या घरी बेहिशेबी रोकड आणि ऐवज सापडल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांच्याविरोधात सीआयडीची सध्या चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप देखील आहे. मात्र, या आरोपांची सत्यता अद्याप कोर्टात सिद्ध झालेली नाही.
काय आहे घोष यांची केस?
भारती यांचं नाव पराकोटीच्या ममता विरोधामुळे चांगलंच चर्चेत आहे. ममता बॅनर्जी यांनी अनेकदा भारती घोष यांचं नाव चांगल्या अधिकाऱ्यांच्या यादीत घेतलं होतं. मात्र, ममता बॅनर्जी यांचेच एकेकाळचे सहकारी आणि घोष यांच्या गुड फेथ यादीमधलं नाव म्हणजेच मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून घोष ममता बॅनर्जींच्या ब्लॅक लिस्टमध्ये गेल्याचं सांगितलं जातं. पश्चिम बंगालच्या सबांगमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला सहाय्य केल्याचा आरोप देखील घोष यांच्यावर केला जात आहे. दरम्यान, सध्या फक्त घोष यांचा भाजप प्रवेश झाला असून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही? याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण, भारती घोष मात्र ममत बॅनर्जी यांना हरवण्याच्या निश्चयानेच भाजपमध्ये दाखल झालेल्या आहेत.
Crime Investigation Department conducted raid at three locations of ex-IPS officer Bharati Ghosh in West Bengal; Total of Rs 2.5 crore recovered during the raid. pic.twitter.com/yLa1ey7hfg
— ANI (@ANI) February 6, 2018
कोण आहेत भारती घोष?
- २००६च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी
- संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेसोबत विविध देशांमध्ये कामगिरी
- २०११मध्ये भारतात त्यांच्या होम केडर-पश्चिम बंगालमध्ये परतल्या
- २०१२मध्ये पश्चिम मिदनापूर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती
- २०१६पर्यंत अनेक माओवाद्यांची घोष यांच्यासमोर शरणागती
- २०१४मध्ये माओवाद्यांविरोधातल्या कामगिरीबद्दल पोलीस सर्व्हिस पदकाने सन्मान
- २०१४मध्येच निवडणूक आयोगाने संशयास्पद भूमिकेबद्दल लांबच्या ठिकाणी पोस्टिंग करवली
- २०१६मध्ये देखील पुन्हा एकदा स्वत:चा जिल्हा सोडून दूर राहाण्याची वेळ
- २०१८मध्ये घोष यांच्या घरी बेहिशेबी संपत्ती सापडल्याचा सीआयडीचा दावा
- २०१८मध्येच घोष यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली
- २०१९मध्ये भारत घोष यांनी भाजपमध्ये प्रवेश केला