वाढत्या लोकसंख्येसोबतच सायलेंट किलर म्हणजेच हळूहळू वाढणाऱ्या आणि असंसर्गजन्य आजारांची संख्या वाढली आहे. हायपरटेंशन, डायबिटीस, धूम्रपान, दारुचं व्यसन आणि बदललेली जीवनशैली या सर्वातून आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या किडनी या अवयवावर परिणाम होत असून पूर्णपणे निकामी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातून किडनीचं काम हळूहळू पूर्वपदावर यावं यासाठी डायलिसीसवर ही ताण येत आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत जगात २५ टक्के किडनी विकारांमध्ये वाढ झाली आहे.
४ हजार किडनी रुग्णांची नोंद
१४ मार्च ‘ जागतिक किडनी दिन’ म्हणून साजरा केला जातो. पण, अनेक कारणांमुळे किडनीवर परिणाम होत असून सर्वात जास्त डायबिटीसमुळे किडनीवर परिणाम होत आहे. जे.जे या सरकारी रुग्णालयामध्ये दरवर्षी ४ हजार किडनी रुग्णांची नोंद होते. तर, ओपीडीत किमान १५० नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. तर, २०१७ मध्ये ४ हजार ३३१ आणि २०१८ मध्ये ५ हजार १४० रुग्ण डायलिसीसवर होते. २०१७ मध्ये जे.जे हॉस्पिटलमध्ये ४ जणांवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. तर, गेल्या दीड वर्षांपासून ६ जण किडनीच्या प्रतिक्षेत आहेत. कारण, आजही महाराष्ट्रासह मुंबईत अवयवदानाबाबतीत जनजागृती तितकीशी नाही. त्यामुळे, ब्रेनडेड रुग्णांचे नातेवाईक अवयवदानासाठी पुढेच येत नाहीत, अशी खंत जे.जे रुग्णालयाच्या नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी प्रत्यारोपण विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. गीता शेटे यांनी व्यक्त केली आहे.
आजार वाढत आहे
चाळीशीनंतर हायपरटेंशन आणि डायबिटीस हे आजार आपसूकच जडतात. त्यामुळे, या वयातील लोकांमध्ये किडनी विकार होणं हे सामान्य असलं तरी हा आजार वाढत आहे. किडनी विकारांमध्ये ही चार स्टेजेस असतात. शेवटच्या स्टेजमध्ये रुग्णांना डायलिसीसवर ठेवलं जातं. पण, अनेकांना डायलिसीस करुन घेणं ही परवडत नाही