कर्जत तालुक्यातील कळंब गावातील पोश्री नदी पात्रात आज ५ ऑगस्टला एक २७ वर्षीय तरुण वाहून गेला. पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमने शोधकार्य सुरू केले आहे. मात्र सायंकाळ सहा वाजेपर्यंत तरुण सापडून आला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब कातकर वाडी येथे राहणारा २७ वर्षीय तरुण शशी भीमा वाघमारे हा आपला मित्र महेंद्र बदे यांच्यासोबत चारचाकी गाडी धुण्यासाठी कळंब गावाजवळील पोश्री नदीवर गेला होता. नदीपात्रातील ‘चौदावा डोह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोहात पाय घसरून पडला. या डोहात पाणी खोलवर असल्याने तो पाण्याचा प्रवाहात वाहून दिसेनासा झाला. त्याच्यासोबत असलेला महेंद्र बदे याने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने स्थानिक लोक जमा झाली. त्यांनी ताबडतोब घटनेची माहिती पोलिसांना दिली .
या घटनेची माहिती समजतात नेरळ पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस अधीकारी संजय बांगर , उप निरिक्षक केतन सांगळे त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार भरत गर्जे ,पो ह .गिरी ,निरंजन दवणे, एकनाथ गर्जे ,चव्हाण मॅडम ,भोईर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने नदी पात्रात शोध घेतला, मात्र तरुण सापडला नसल्याने खोपोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
एका तासाभरात खोपोली येतील रेस्क्यू टीमचे प्रमुख गुरू साठेलकर त्याच्या सहकाऱ्यांसह दाखल झाले आणि तातडीने नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली आहे. संध्याकाळपर्यंत शोधमोहीम सुरूच असून, अद्यापही तरुण सापडून आला नाही .
काही दिवसांपूर्वीच देवपाडा येथील तरुण २६ वर्षीय जगन जोशी हा पोश्री नदीत वाहून गेल्याची घटना घडली होती, मात्र त्याचाही शोध आजपर्यंत लागला नाही, आज पुन्हा शशी वाघमारे हा तरुण बुडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
पोश्री नदी पात्रातील कळंब गावा नजीक असलेल्या ‘चौदावा डोह’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या डोहात आजपर्यंत अनेक जण बुडल्याच्या घटना घडल्या असल्याचे येथील स्थानिक सांगतात. हा डोह खोल असून तळाशी काही कपाऱ्या असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे या डोहात बुडालेली व्यक्ती जिवंत बाहेर येत नसल्याचे या भागातील माहितगार सांगतात, त्यामुळे सहसा डोहाकडे कोणी फिरकत नाहीत .
– कांता हाबळे(नेरळ)