घरताज्या घडामोडीआईसह तीन चिमुकल्यांचे गळफास, मृतदेह झाडावर

आईसह तीन चिमुकल्यांचे गळफास, मृतदेह झाडावर

Subscribe

वडिलांचे विषप्राशन, संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ

काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील खर्डी जंगलात तिघा युवकांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी भिवंडी तालुक्यातील पडघाजवळील उंबरखांड पच्छापूर जंगलात आईसह तीन छोट्या मुलांचे मृतदेह झाडावर गळफास लागलेल्या अवस्थेत आढळले. या चौघांच्या मृत्यूची बातमी कळताच पित्यानेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अतिशय संशयास्पद आणि भयंकर घटनेमुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

21 ऑक्टोबर 2020 रोजी पडघा पोलीस ठाण्यात उंबरखांड गावातील श्रीपत बच्चू बांगारी यांनी पत्नी रंजना (30 वर्षे), मुलगी दर्शना (12), मुलगा रोहीत (9), मुलगी रोहिणी (6) हरवल्याची तक्रार नोंदवली होती. बुधवारी दुपारी श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता उग्र दुर्गंधी आली. त्याने जाऊन पाहिले असता एका झाडावर चौघांच्या मृतदेहांचे जवळपास सांगाडे लटकलेले होते. पोशाखावरून त्यांची ओळख पटताच त्याने धावत जाऊन भाऊ श्रीपतला माहिती दिली.

- Advertisement -

पत्नी आणि तीन मुलांच्या मृतदेहाविषयी समजताच श्रीपतने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, पडघा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

- Advertisement -

दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे एकाच झाडावर गळफास स्थितीत आढळल्याने या भागात भीती निर्माण झाली आहे. ठाणे फॉरेन्सिक विभागाचे पथकही घटनास्थळी तपासणीसाठी आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -