एका १५ वर्षाच्या मुलीने जखमी वडिलांना आपल्या सायकलवर बसवून गुरुग्रामहून थेट बिहार गाठल्याची घटना समोर आली आहे. जवळजवळ एक आठवडा या मुलींने आपल्या वडिलांना मागे बसवून प्रवास केल्यानंतर या दोघांनी बिहार गाठले आहे. या मुलीने एका आठवड्यात तब्बल १ हजार २०० किमीचा प्रवास केला आहे. या मुलीचे नाव ज्योति कुमारी असे आहे.
नेमके काय घडले?
गुरुग्राम येथे सातवीत शिकणारी ज्योति आणि तिचे वडिल राहत होते. मात्र, त्यांच्याकडे घर मालकाने पैशाची मागणी केली. तसेच पैसे नसतील तर घर खाली करा असे देखील सांगितले. त्यामुळे त्यांनी घर खाली करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ज्योतिचे वडिल रिक्षा चालक असून सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचा व्यवसाय देखील बंद आहे. त्यातच त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे ते सध्या घरीच होते. त्यामुळे त्यांनी बिहारला स्वत:च्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. याकरता त्यांनी ट्रक चालकाला विचारणा केली असता त्यांनी दोघांच्या प्रवासाचे सहा हजार होतील असे सांगितले. मात्र, त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते.
अखेर ज्योतिने बाजारात जाऊन ५०० रुपयात सायकल विकत घेतली आणि गुरुग्राम ते बिहार असा सायकलवरुन वडिलांना घेऊन प्रवास केला. ज्योतिने याबाबत सांगितले आहे की, ‘सुरुवातीला मला फार भीती वाटली होती. मात्र, मला हायवेवर सायकल चालवण्याची भीती वाटत नाही. कारण नागरिक पदपथावरुन चालतात. मात्र, मागून येणारे मोठमोठे ट्रक गाड्या यांची मला भीती वाटत होती. एखाद्यावेळेस ते आपल्याला उडवतील का?, असे सतत वाटत होते. मात्र, सुदैवाने तसे काहीही झाले नाही. आम्ही सुखरुप आमच्या गावी पोहोचलो’.
दोघांनाही केले क्वॉरटाइन
ज्योतिने दिलेल्या माहितीनुसार, तिला आणि तिच्या वडिलांना सध्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – दिलासा! दुर्मिळ आजारातून नऊ महिन्यांच्या कुनैनची मुक्तता