उत्तर प्रदेशातील पाली क्षेत्रात भीषण अपघात झाला असून 7 शेतकरी बेपत्ता झाल्याची असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये जवळपास 20 शेतकरी बसले होते. परंतु 13 शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. तर 7 शेतकरी बेपत्ता झाले आहेत.
या घटनेची माहिती डीएम आणि एसपी यांनी मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तसेच बेपत्ता शेतकऱ्यांना बोटीच्या माध्यमातून नदीच्या बाहेर काढले जात आहेत. पाली पोलीस स्टेशन हद्दीतील बेगराजपूर गावातील लालराम, देवेंद्र, अजयपाल, रहिश, पिंटू, सुनील, गौरा यांच्यासह सुमारे 20 शेतकरी आज सकाळी निजामपूर पुलावर काकडी विकण्यासाठी गेले होते.
दुपारी काकडी विकल्यानंतर सर्व शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीने घरी जात होते. गर्रा पुलावर ट्रॅक्टरचे चाक बाहेर आले, त्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉलीचा बॅलन्स बिघडला आणि ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत कोसळली. ही घटना पाहून आजूबाजूचे लोक आणि बेगराजपूर ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. लालाराम, देवेंद्र, अजयपाल, रामरिश, पिंटू, सुनील, गौरा, रामसिंग, पारस, रामधुनी, रमेश, रामरहीस द्वितीय, रघुनाथ यांना नदीतून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे.
डीएम अविनाश कुमार, एसपी राजेश द्विवेदी, एडीएम वंदना त्रिवेदी, एएसपी पूर्वी दुर्गेश सिंह आणि सीओ शाहाबाद घटनास्थळी पोहोचले. डीएमने सांगितले की, ट्रॅक्टर चालक मुकेश, रिंकू, मझिले, रवी, अमित, नन्हेलाल आणि मुकेश पुत्र रामभरोसे नदीच्या आत असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच ट्रॅक्टर-ट्रॉली काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली असून बोटीच्या मदतीने शेतकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा : केडीएमसीच्या तोतया अधिकाऱ्याला अटक, ठाकुर्लीत ज्येष्ठ नागरिकाची केली होती लूट