पुलवामा हल्ल्याला भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर देशातील लोकांमध्ये जोश संचारला आहे. त्यातही विंग कमांडर यांच्या अभिनंदन वर्थमान यांच्या सुखरुप वापसीनंतर भारतीयांचा जोश ‘हाय’ झाला आहे. सध्या लोकांमध्ये देशभक्तीची लाट पसरली असून, लोक आपापल्या परीने शूर जवानांचं अभिवादन करत आहेत. दरम्यान, एअर इंडिया या विमान कंपनीकडूनही एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि सोबतच प्रवाशांच्यादृष्टीने हा निर्णय महत्वाचा असल्याचं सांगितलं जातंय. यापुढे एअर इंडियाच्या प्रत्येक विमान प्रवासामध्ये केबीन क्र्यू आणि कॉकपीट क्र्यूला प्रवास सुरु करण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या सूचना दिल्यानंतर ‘जय हिंद’ म्हणणं अनिवार्य असणार आहे. एअर इंडिया कंपनीकडून हा आदेशच देण्यात आला आहे. यानिमित्तामे विमानातून प्रवास करणारे प्रवासीही साहाजिकच जय हिंदचा नारा देतील. सोमवारी कंपनीने दिलेल्या पत्रकातून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली.
Air India has issued a circular to all cabin crew and cockpit crew directing them to say ‘Jai Hind’ after any announcement onboard. pic.twitter.com/t488kZSCzy
— ANI (@ANI) March 4, 2019
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, प्रचंड उत्साहात पण तितक्याच आत्मियतेने प्रत्येक क्र्यू मेंबर्सनी ‘जय हिंद’चा नारा देणं अपेक्षित आहे. विमान प्रवासादरम्यान कोणतीही घोषणा केल्यानंतर काही सेकंदांच्या विरामानंतर आता ‘जय हिंद’चीही घोषणा केली जाईल. याआधी २०१६ मध्ये एअर इंडियाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अश्वनी लोहानी यांनी त्यांच्या कार्यकाळात असेच आदेश दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रवाशांमधील देशभक्तीला बढावा देण्यासाठी अशाप्रकारचा निर्णय एअर इंडिया कंपनीकडून घेण्यात आल्याचं समजतंय. या निर्णयामुळे यापुढे एअर इंडियाच्या प्रत्येक विमान प्रवासात ‘जय हिंद’चा नारा घुमणार असून, प्रवाशांमधील देशभक्ती पाहायला मिळणार आहे.