‘पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसोबत पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासाखं वागतात’, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. यासाठी नायडू राजधानी दिल्लीत लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. यावेळी अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. अरविंद केजरीवाल यांनी देखील चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी ते आंध्र भवन येथे आले होते. तिथे त्यांनी मोदींवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘जेव्हा कुणी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो, तेव्हा तो फक्त पक्षाचा मुख्यमंत्री नसून पूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. त्याचप्रमाणे जेव्हा कुणी देशाचा पंतप्रधान बनतो, तेव्हा तो फक्त पक्षाचा पंतप्रधान नसून पूर्ण देशाचा पंतप्रधान असतो. ते विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी अशी वर्तवणूक करतात. जसे ते भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.’
‘पाकिस्तानी सैन्याने दिल्ली काबीज केल्यासारखं वाटतय’
अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. त्यांनी सध्या गाजत असलेल्या सीबीआय प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीबीआयला जप्त केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं दिल्ली काबीज केली आहे की काय? अशी शंका मनात निर्माण होते.’ यावेळी केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केलं. ते म्हणाले की, ‘मी ममता ताईंचे अभिनंदन करतो की, त्यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्याविरोधात मोठा लढा दिला.’
हेही वाचा – मोदी दिल्ली के लिए, तूँ तो हानिकारक है – अरविंद केजरीवाल