पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना इशरत जहाँ चकमकप्रकरणी सीबीआयला अटक करायची होती. परंतू, असे झाले नाही. हा धक्कादायक खुलासा गुजरातचे माजी पोलीस महानिरीक्षक डी. जी. वंजारा यांनी केला आहे. या घटनेच्या वेळी मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री तर अमित शहा गृहराज्यमंत्री पदावर कार्यरत होते.
शहांना गुजरातमध्ये येण्यास घातली बंदी
डी. जी. वंजारा यांनी एका विशेष न्यायालयात हा खुलासा केला की, सीबीआयला मोदी आणि शाह यांना अटक करायची होती. ही माहिती वंजारा यांचे वकील व्ही. डी. गज्जर यांनी न्या. जे. के. पांड्या यांना दिली. यापूर्वीही अमित शहा यांना गुजरातच्या गृहराज्यमंत्री पदावर असताना न्यायालयाच्या आदेशामुळे आपल्याच राज्यात येण्यास चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.
मोदी करायचे प्रकरणाची चौकशी
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना इशरत जहाँ चकमकप्रकरणी डी. जी. वंजारा हे तपास अधिकारी होते. मोदी गोपनीयरित्या याप्रकरणी आपल्याकडे चौकशी करायचे, असे वंजारा यांनी यापूर्वीच न्यायालयात सांगितले आहे. वंजारा याप्रकरणी सध्या जामिनावर आहेत. तर सीबीआयने शाह यांना २०१४ मध्ये पुरेशा पुराव्याअभावी दोष मुक्त घोषित केले होते.
काय आहे इशरत जहाँ चकमकप्रकरण ?
१५ जून २००४ मध्ये मुंबईतील मुंब्रा येथील इशरत जहाँ (वय १९), तिचा मित्र जावेद उर्फ प्राणेश आणि मूळ पाकिस्तानी जिशान जौहर आणि अमजद अली राणा यांना माजी पोलीस महानिरीक्षक वंजारा यांच्या पथकाने अहमदाबादजवळ एका चकमकीत ठार मारले होते. इशरत आणि तिचे मित्र लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते आणि ते तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखत होते, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. नंतर सीबीआयने आपल्या तपासात ही बनावट चकमक असल्याचा निष्कर्ष काढला होता.