घरCORONA UPDATEकोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय वैज्ञानिक पुराव्यांआधारेच- NTIGI

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय वैज्ञानिक पुराव्यांआधारेच- NTIGI

Subscribe

भारताकडे यासंबंधित वैज्ञानिक पुरावे पडताळणीची सक्षम यंत्रणा असल्याची माहितीही एनटीएजीआय अध्यक्ष, एन के अरोरा यांनी दिली.

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय एडोनोवेक्टर लसीच्या प्रतिक्रियेसंबंधित मुलभूत वैज्ञानिक आधारावर घेतल्याचे आज एनटीएजीआय अध्यक्ष डॉ.एन.के.अरोरा यांनी सांगितले आहे. यानुसारच दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवड्यांहून वाढवून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत केले आहे. इंग्लडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत संस्थेने “एप्रिल २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात आकडेवारी जाहीर केली. यावरुन लक्षात आले की, दोन डोसमधील अंतर १२ आठवडे असेल तर लसीचा परिणाम ६५ ते ८८ टक्के इतका उंचावतो. याच आधारावर त्यांनी अल्फा विषाणू प्रकारामुळे फैलावलेली महामारी नियंत्रणात आणली. लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवडे कायम राखल्याने इंग्लंड देश महामारीतून बाहेर येण्यात यशस्वी ठरला, असे डॉ अरोरा म्हणाले. आम्ही विचार केला ही खूपच चांगली पद्धत आहे, कारण कालावधी वाढल्यावर एडोनोवेक्टर लस अधिक उत्तम पद्धतीने काम करते याचे पुरेसे मुलभूत वैज्ञानिक पुरावे आपल्याकडे होते. म्हणून १३ मे रोजी दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात लोकांच्या वेळेचाही विचार केला आहे. कारण प्रत्येकजणच दुसरा डोस घेण्यासाठी अचूक १२ व्या आठवड्यात जाऊ शकत नाही.

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय वैज्ञानिक पुराव्यांआधारेच घेतल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “आपल्या इथे खूपच पारदर्शक आणि खुल्या प्रणालीद्वारे काम चालते. इथे वैज्ञानिक आधारावरच निर्णय घेतले जातात. कोविड कार्य समूहाने एकमताने हा निर्णय घेतला आहे. यात कोणतेही मतभेद नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. एनटीएजीआयच्या बैठकीत या मुद्याच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने चर्चा झाली. तिथेही कोणतेही मतभेद नव्हते. त्यानंतर, दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करायला हवा अशी शिफारस करण्यात आली. ”

- Advertisement -

आधीचा चार आठवड्यांच्या कालावधीचा निर्णय तेव्हाच्या चाचण्यांवर आधारीत होता, असे डॉक्टर अरोरा यांनी सांगितले. दोन मात्रांमधील कालवधी वाढवला की लसीची परिणामकारकता वाढते या अभ्यासावर आधारित हा निर्णय असल्याचे ते म्हणाले. “कोविशील्डवरच्या अभ्यासाचे निष्कर्ष सुरुवातीला खूपच जास्त प्रकारचे वेगवेगळे होते. कोविशील्डची लस डिसेंबर २०२० मधे आली. इंग्लडसारख्या काही देशात तेव्हाच डोसमधील कालावधी १२ आठवडे राखण्याचा निर्णय घेतला होता. या आकडेवारीची माहिती आम्ही घेतली. कालावधी संदर्भात निर्णय घेताना ब्रिजिंग ट्रायलच्या (यात जनुकीय संरचना लक्षात घेतली जाते) आधारे चार आठवड्यांचा कालावधी ठेवण्याचा निर्णय घेतला. याचे चांगले परिणाम दिसून आले.

त्यानंतर आम्हाला अतिरिक्त शास्त्रीय आणि प्रयोगशाळेतील आकडेवारी उपलब्ध झाली. त्यानुसार 6 आठवड्यानंतर किंवा जवळपास, आम्हाला असे वाटले की अंतर ४ आठवड्यांवरून ८ आठवडे करावे. अध्ययनात असे दिसले की लसींच्या मात्रांमधील अंतर ४ आठवड्यांचे ठेवल्यावर तिची परिणामकारकता ५७% होती आणि हे अंतर ८ आठवडे केल्यावर तिचे प्रमाण सुमारे ६०% झाले असे ते म्हणाले.

- Advertisement -

एनटीएजीआयने या आधीच कालावधी १२ आठवडे का केला नाही असे विचारले असता, “इंग्लडच्या (एस्ट्रा-जेनेका लसीचा दुसरा सर्वात मोठा वापरकर्ता) मुलभूत आकडेवारीची वाट बघायला हवी असे आम्ही ठरवले होते असे डॉ. अरोरा यांनी सांगितले. एस्ट्रा-जेनेका लसीच्या दोन मात्रा १२ ते १६ आठवड्याच्या अंतराने घेणाऱ्या कॅनडा, श्रीलंका आणि इतर काही देशांचीही उदाहरणे समोर असल्याचे ते म्हणाले. जे अस्ट्राझेन्का लसीसाठी १२ ते १६ आठवड्यांचे अंतर राखत आहेत जे कोविशील्ड लसीसाठी असलेल्या अंतराएवढेच आहे.

एका डोसच्या तुलनेत दोन डोस सुरक्षित

लसीची एकच मात्रा घेतल्याने आणि दोन मात्रा घेतल्याने किती परिणाम होतो याबाबतचे अहवाल येत होते असे डॉ अरोरा यांनी सांगितले. एनटीएजीआय या मुद्यावरही लक्ष ठेऊन होती. “दोन मात्रांमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला, त्यानंतर २ ते ३ दिवसातच एस्ट्रा-जेनेकाची एकच मात्रा घेतल्याने ३३ टक्के तर दोन मात्रा घेतल्यावर ६० टक्के सुरक्षा मिळते असा अहवाल इंग्लडहून आला. मे महिन्याच्या मध्यापासून भारताने चार किंवा आठ आठवड्याचा कालावधी पुन्हा लागू करावा की नाही या मुद्यावर चर्चा सुरु होती.

लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावाचे मुल्यांकन करण्यासाठी एक मागोवा घेणारे व्यासपीठ तयार करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. “एनटीएजीआयने हा निर्णय घेतला तेव्हाच, लस मागोवा व्यासपीठही तयार करण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरुन केवळ लस कार्यक्रमाच्या प्रभावाचेच मूल्यांकन नाही तर लसीचा प्रकार आणि मात्रांमधील कालावधी तसेच पूर्ण किंवा अंशत: लसीकरण करुन घेणाऱ्यांवर काय परिणाम होतो, याचेही मूल्यांकन करता यावे. भारतासाठी हे खूपच महत्वाचे आहे कारण, आपल्या जवळपास १७ ते १८ कोटी लोकांनी आतापर्यंत एकच मात्रा घेतली आहे तर जवळपास चार कोटी लोकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

डॉ. अरोरा यांनी पीजीआय, चंदिगढच्या एका अध्ययनाचा उल्लेख केला. यात आंशिक आणि पूर्ण लसीकरणाच्या परिणामांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. “पीजीआय, चंदिगडच्या अध्ययनावरुन स्पष्ट होते की जेव्हा लसीची पहिली आणि दुसरी मात्रा दिली तेव्हा या दोन्ही प्रकरणात लसीचा परिणाम ७५ टक्के होता. यावरुन स्प्ष्ट झाले की किमान कालावधीत लसीचा परिणाम समान असतो. भले एक मात्रा घ्या की दोन. अल्फा विषाणू प्रकाराच्या आधारावर हे अध्ययन होते. याच प्रकाराने पंजाब, उत्तर भारतात कहर केल्यानंतर दिल्लीकडे मोर्चा वळवला होता. याचा हा देखील अर्थ होता की भले तुम्ही एकच मात्रा घेतलीत तरी तुम्ही सुरक्षित आहात.

सीएमसी वेल्लौरच्या अध्ययनातूनही हेच परिणाम समोर आले आहेत. “काही दिवसांपूर्वी, एक आणखी खूपच महत्वाचे अध्ययन सीएमसी वेल्लौर, तमिळनाडू इथे करण्यात आले. यात भारतात मे २०२१ मधे आलेल्या महामारीच्या दूसऱ्या लाटेवर अभ्यास करण्यात आला. यात असे समोर आले की, ज्यांनी कोविशील्डची एकच मात्रा घेतली आहे त्यांच्यावर लसीचा परिणाम ६१ टक्के झाला. तर दुसरी मात्रा घेतलेल्यांवर याचा परिणाम ६५ टक्के झाल्याचे दिसून आले. दोघांमधे खूपच कमी फरक होता. विशेषत: तेव्हा, जेव्हा अशा अध्ययनात परिणामांमधे थोड्या चढउताराची शक्यता असते असे डॉ अरोरा म्हणाले.

लसीच्या सक्षमतेवर होणारा अभ्यास आणि देखरेख

पीजीआय, चंडीगढ आणि सीएमसी वेल्लौर इथल्या अभ्यासा शिवाय दिल्लीच्या दोन वेगवेगळया संस्थांद्वारे केलेला अभ्यासही पुढे येतोय असे डॉ अरोरा यांनी सांगितले. या दोन्ही अध्ययनात असे दिसते की पहिली मात्रा घेतल्यावर संसर्गाचे प्रमाण ४ टक्के आणि दुसरी मात्रा घेतल्यावर ५ टक्के होते म्हणजेच दोन्हीमध्ये काही विशेष फरक नाही. विविध स्रोतांकडून मिळणारी आकडेवारी एकत्र करुन, लसीकरण कार्यक्रमाच्या विविध पैलूंआधारे त्याचे मूल्यांकन आणि लसीकरणाच्या परिणामांचा अभ्यास केला जाईल.

कोविशील्डच्या मात्रांमधील कालावधी वाढवण्याचा काही प्रस्ताव?

निर्णय वैज्ञानिक आधारावरच घेतले जातील आणि लोकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. कोविड-१९ आणि लसीकरण या सतत बदलत राहणाऱ्या प्रक्रिया आहेत. उद्या आमचा वॅक्सीन प्लॅटफॉर्म आम्हाला सांगेल की मात्रांमध्ये अतिशय कमी अंतर लोकांसाठी चांगले आहे, मग त्याचे फायदे ५ ते १० टक्केच असले तरी अशी सूचना किती योग्य आहे त्याबाबत आमची समिती निर्णय घेईल. पण जर सध्याचा निर्णयच योग्य असल्याचे दिसून आले तर आहे तसेच सुरू राहील, असे ते म्हणाले. शेवटी आपल्या समुदायाचे आरोग्य आणि संरक्षण सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, हीच तर सर्वात महत्त्वाची अशी बाब आहे ज्यासाठी आपण चर्चा करतो, नवे शास्त्रीय पुरावे निर्माण करतो आणि निर्णय घेतो, यावर त्यांनी भर दिला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -