भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. (Kalyan Singh passed away) वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह हे चार जुलैपासून लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल होते. अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण सिंह यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. कल्याण सिंह हे राजस्थानचे राज्यपाल देखील होते. याशिवाय, ते भाजपचे संस्थापक नेते होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा समावेश आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोनवर कल्याणसिंह यांची तब्येत जाणून घेतली होती. कल्याण सिंह यांची तब्येत जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अनेक वेळा हॉस्पिटलला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटलं की, “मी खूप दु: खी आहे. कल्याण सिंह जी… एक राजकारणी, अनुभवी प्रशासक, तळागाळातील नेते आणि एक महान व्यक्ती होते. उत्तर प्रदेशच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान आहे. मी त्यांचा मुलगा राजवीर सिंह यांच्याशी बोललो आणि शोक व्यक्त केला. ओम शांती.”
I am saddened beyond words. Kalyan Singh Ji…statesman, veteran administrator, grassroots level leader & great human. He leaves behind an indelible contribution towards the development of Uttar Pradesh. Spoke to his son Rajveer Singh and expressed condolences: PM Modi https://t.co/Fd4kL0nWfs pic.twitter.com/SeaTIyl6Ed
— ANI (@ANI) August 21, 2021
कल्याण सिंह यांनी राम मंदिराच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली. १९५२ मध्ये कल्याण सिंह यांचा विवाह रामवती देवी यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगी प्रभा वर्मा आणि एक मुलगा राजवीर सिंह आहे. राजवीर सिंह हे भाजपचे खासदार आहेत. त्याचबरोबर कल्याण सिंह यांचा नातू संदीप सिंह यूपीच्या योगी सरकारमध्ये मंत्री आहे.
कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील अत्रौली येथे झाला. कल्याण सिंह यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतलं होतं. ते तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही बनवण्यात आलं.
राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कल्याण सिंह यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. याच दिवशी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारनेही यूपीचे कल्याण सिंह सरकार बरखास्त केले. यानंतर सप्टेंबर १९९७ ते नोव्हेंबर १९९९ पर्यंत कल्याण सिंह यांना पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.