देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सुषमा स्वराज यांचे जाण्याने राजकीय वर्तुळातच नाही तर समान्य स्तरातून देखील त्याच्या अचानक घेतलेल्या एक्झीटमुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे. स्वराज या परराष्ट्रखात्याच्या मंत्री असताना ट्विटवरुन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या लोकप्रिय होत्या. जगभरातील भारतीयांनी त्यांना टॅग करुन केलेल्या ट्विटवर त्या प्रतिक्रिया देत असत. सुषमा स्वराज यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अगदी शेवटपर्यंत त्यांचे लक्ष लोकसभेच्या कामकाजावर होते. हे त्यांनी केलेल्या अखेरच्या ट्विटमधून दिसून येते.
प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणापासून दूर गेलेल्या सुषमा स्वराज ट्विटरवर मात्र नेहमी सक्रिय होत्या. कलम ३७० रद्द केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आणि त्यांचे हेच ट्विट अखेरचे ठरले.
सुषमा स्वराज यांनी सायंकाळी कलम ३७० संदर्भात निर्णय घेण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. ‘प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji – Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 6, 2019
‘मी माझ्या आयुष्यात याच दिवसाची वाट पहात होते’ असे शब्द असणारे हे ट्विट स्वराज यांच्या निधनाच्या बातमीनंतर चांगलेच व्हायरल झाले आहे. काल राज्यसभेमध्ये कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही त्यांनी अभिनंदन केले होते.