बनारसहून दिल्लीला जाणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमध्ये केंद्रिय मंत्र्यासह सहप्रवाशांना दुर्गंधीयुक्त जेवण वाढण्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून जीजीएमकडून आज तपासणी करण्यात आली.
मंत्र्यासह सहप्रवाशांना खराब अन्नाचा पुरवठा
बनारसहून दिल्लीला जाणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमध्ये रविवारी कानपूरमध्ये केंद्रीय राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्यासह सहप्रवाशांना हीनदर्जाचे दुर्गंधीयुक्त जेवण वाढण्यात आले. प्रवाशांसह साध्वी निरंजन ज्योतींनी रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत या घटनेबाबतची तक्रार दाखल केली.
अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सोपवणार
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आज मंगळवारी आयआरसीटीसीचे जीजीएम एम पी सिंह यांनी दिल्लीहून कानपूरला जात प्रकरणाची सत्यता तपासली. यावेळी त्यांनी जेवणाचा पुरवठा करणाऱ्या संबंधीत कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. एम पी सिंह यांनी आज संपूर्ण दिवस कानपूरमध्ये राहून प्रकरणाची चौकशी केली. लवकरच सिंह या प्रकरणाचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सोपवणार आहेत.