अयोध्या येथील बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमिनीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. जमियत-उलेमा-ए-हिंद या मुस्लिम संघटनेने ही याचिका दाखल केली आहे. त्या पद्धतीने बाबरी मशीद पाडली, त्या मुद्द्याचा आधार घेऊन ही याचिका करण्यात आली आहे. ‘टाईम्स नाऊ’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. यावर सुनावणी कधी होणार हे जरी न्यायालयाकडून जाहीर करण्यात आले नसले, तरी ही सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी जमियतकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या निकालावर मुस्लीम लॉ बोर्ड देखील याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला. यामध्ये रामलल्ला अर्थात भगवान राम यांचा वादग्रस्त जागेवरील दावा मान्य करत न्यायालयाने त्या जागी मंदिर उभारणी करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याचवेळ मुस्लीम पक्षकारांना अयोध्येमध्येच दुसऱ्या मोक्याच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीन देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. यासोबतच, राममंदिर उभारणीसाठी येत्या २ ते ३ महिन्यांमध्ये स्वतंत्र ट्रस्टची स्थापना करण्याचे देखील निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
Maulana Syed Ashhad Rashidi, legal heir of original Ayodhya land dispute, files review petition in the Ayodhya land dispute case in Supreme Court.
— ANI (@ANI) December 2, 2019
जमियत उलेमाचे उत्तर प्रदेशमधील सचिव मौलाना अशद रशिदी यांनी ही याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी मुस्लीम बोर्डासह सगळ्यांनीच पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यासोबतच, मुस्लीम लॉ बोर्ड देखील लवकरच ही फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, सुन्नी वक्फ बोर्डाने मात्र याचिका दाखल न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.