केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहाःकार केला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेल्या भूस्खलनाने केरळमध्ये आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच काही जण बेपत्ता झाल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत चर्चा केली असून मोदींनी सर्व लोकांच्या सुरक्षितेतसाठी प्रार्थना केली. याबाबतचे ट्वीट स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘केरळमधील मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या परिस्थितीवर मी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली. जखमी आणि बाधित लोकांच्या मदतीसाठी प्रशासन ग्राउंड लेव्हला काम करत आहेत. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.’ मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्यांसाठी पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवितहानी झाल्याचे पाहून दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी सांत्वन केले आहे.
"Spoke to Kerala CM Pinarayi Vijayan and discussed the situation in the wake of heavy rains and landslides in Kerala. Authorities are working on the ground to assist the injured and affected. I pray for everyone’s safety and well-being," tweets PM Narendra Modi.
(File photos) pic.twitter.com/dnvfN9T5Uk
— ANI (@ANI) October 17, 2021
केरळ येथील पठानमथिट्टामधील परिस्थितीही अत्यंत बिकट बनली आहे. कोट्टायम जिल्ह्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला असून इडुक्की जिल्ह्यात ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती केरळच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे.
पावसाचा तडाखा बसलेल्या केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायम जिल्ह्याच्या आसपासच्या भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे. कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहने वाहून गेली आहेत. नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत.
११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी
तिरुवनंतपूरम, अल्लाप्पुझा, इडुक्की, कोल्लम, पठानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, मलप्पूरम आणि कोझीकोड यासह ११ जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी