वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात. पाऊस पडावा यासाठी कुठे बेडकाची तर कुठे गाढवांची लग्न लावली जातात. नुकतेच मध्य प्रदेशातील छत्तकपूर येथील एका मंदिरात दोन बेडकांची लग्न लावण्यात आली आहेत. अशी लग्न लावल्यामुळे पाऊस पडतो, ही खरं तर अंधश्रद्धाच आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री ललिता यादव यांनी हे लग्न लावले. ललिता यादव यांनी स्थानिक भाजप नेत्यांसोबत ‘आषाढ उत्सवा’चे आयोजन केले होते. यावेळी हा लग्न सोहळा पार पडला.
वर्षभर चांगला पाऊस पडतो
यावेळी सर्वांच्या उपस्थितीत पुजाऱ्यांनी विधीपूर्वक बेडकांची लग्न लावली. त्यानंतर सर्वांसाठी भोजनाचीही व्यवस्था ठेवण्यात आली होती. या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी बेकडांची लग्न लावण्याची जुनी प्रथा आहे. असे केल्याने वर्षभर चांगला पाऊस पडतो, असे त्या मंदिरातील पुजाऱ्याने सांगितले.
Wedding of two frogs organized as part of a ritual held in Chhattarpur to ‘please rain gods’. Madhya Pradesh Minister Lalita Yadav who was also present says’ We have prayed to god for rain in drought hit Bundelkhand region and for the welfare of our farmers’ (22.6.18) pic.twitter.com/q2qxz7taZi
— ANI (@ANI) June 24, 2018
विरोधकांची सडकून टिका
भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र सडकून टिका केली. काँग्रेसने या घटनेवरून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचे म्हटले आहे. सरकारी मंत्र्यांनीच हे काम केल्यामुळे त्याची तीव्रता जास्त आहे. त्यांच्या या टिकेला उत्तर देताना ललिता यादव म्हणल्या, ही अंधश्रद्धा नसून एक परंपरा आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळेच राज्यात दुष्काळ पडतो. बुंदेलखंडावर निसर्ग प्रसन्न नाही. त्यामुळे बेडकांचे लग्न लावणे गरजेचे होते.
या प्रथांना ग्रामीण भागात धोंडी, शंकोबा असं म्हटलं जातं. पाऊस पाडण्यासाठी बेडकांची, गाढवांची लग्नं लावली जातात. देवाला बंदी बनवलं जातं. खरं या सर्व अंधश्रद्धा आहेत.
दोन मुलांचा विवाह सोहळा
बंगळुरूच्या ग्रामीण भागात वरुणराजाचे आगमन व्हावे यासाठी मुलांचे एकमेकांशी लग्न लावले जाते. आगळ्यावेगळ्या विवाहात एक मुलगा वराच्या पोशाखात तर दुसरा मुलगा वधूच्या वेशात लग्नाला उभा राहतो. मग त्यांचे लग्न लावले जाते. हा विवाह पुरेसा पाऊस पडावा म्हणून करण्यात आलेल्या पूजेचा एक भाग असल्याचे स्थानिक सांगतात. या विवाहामुळे संपूर्ण भागात पाऊस पडून भरपूर धनधान्य पिकेल, असे गावकरी मानतात. हा विवाह सोहळा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आयोजित केला जातो.
गाढवांच्या लग्नाची गोष्ट
सोलापूर, नगर, सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात गाढवांची लग्न लावली जातात. त्याबाबत अख्यायिकासुद्धा आहे. पाऊस हा वरुणदेवाचा प्रांत. त्याच्या मर्जीनुसारच पाऊस पडतो. एके वर्षी पाऊस पडलाच नाही. त्यावेळी ऋषीमुनींनी वरुणदेवाला विनंती केली. तरीही त्यानं ऐकलं नाही. शेवटी ऋषी मंडळींनी निषेध म्हणून गाढवाची लग्न लावली. तेव्हा वरुणदेवानं माघार घेतली आणि पाऊस पाडला. अशी समजूत असल्याने आजही काही भागात गाढवांची लग्न लावली जातात.