देशासह राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारव टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
मन की बात आहे पण मनातलं नाही आणि मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, अशी टीका संदीप देशपांडे यांनी ट्विट करत केली आहे. “लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही,” असं ट्विट करत संदीपप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 4, 2021
सर्वाधिक कोरोना मृत्यूंच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानी
देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींचा संख्या दोन लाख २२ हजार ४०८ इतकी झाली आहे. तर देशात सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत अमेरिका (५,९१,०६२) पहिल्या क्रमांकावर आहे, तर ब्राझील (४,०७,७७५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या २४ तासांत देशात तीन लाख ५७ हजार २२९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ३ लाख २० हजार २८९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे नवीन रुग्ण आणि घरी परतलेले रुग्ण ही संख्या दिलासा देणारी आहे. मात्र, देशात दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कोणतीही घट झाली नसल्याचं दिसत आहे.