नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस असतात. पण पोलिसांच्या सुरक्षेचे काय? त्यांच्यावर हल्ला झाल्यास कोण रोखणार? याचा केव्हा विचार केलाय? बुधवारी आंध्रप्रदेशमध्ये असाच काहीसा प्रकार घडला. ज्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील आता प्रकर्षाने पुढे आला आहे. आंध्रप्रदेशातील रापूर गावामध्ये १५० जणांनी चार पोलिसांना जबर मारहाण केली. यामध्ये पोलीस इन्सपेक्टर आणि ३ पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. मारहाण करणारे १५० जण हे एससी कॉलनीतील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक प्रश्नावरून पोलीस स्थानिकांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करत चक्क पोलिसांना मारहाण करण्यात आली. यामध्ये तीन महिलांचा देखील सहभाग आहे. पोलिसांना होत असलेल्या मारहाणीचा सारा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
काय आहे प्रकरण?
रापूर गावातील पिचाया, कनकम्मा आणि लक्षमम्मा या तिघांनी जोसेफेकडून काही रक्कम कर्जाऊ म्हणून घेतली होती. काही दिवसांनी तिघांनी आम्हाला तुझी उधारी फेडता येणार नाही असे जोसेफला सांगितले. त्यानंतर जोसेफने बुधवारी तिघांविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. जोसेफच्या तक्रारीनंतर तिघांनाही पोलिसांनी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान पोलिसांनी तिघांनाही मारहाण केल्याची तक्रार करत १५० जणांच्या गटाने पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. तसेच चौकशीदरम्यान पिचायाला त्रास जाणवू लागल्याने पोलिसांनी त्याला रूग्णालयामध्ये दाखल केले. पोलिसांच्या मारहाणीमुळे हा त्रास झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही बातमी समजताच गावकरी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर धाव घेतली. यावेळी जमावाने तिघांनाही सोडण्याची मागणी केली. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी देखील काहीसा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे जमाव अधिकच आक्रमक झाला. यावेळी जमावाने थेट पोलिसांना लक्ष करत हल्ला केला. हल्ल्यादरम्यान १ पोलीस इन्स्पेक्टर आणि ३ पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. मारहाणी दरम्यान दुसऱ्या पोलीस ठाण्यातून कुमक मागवून जमावाला शांत करण्यात आले. मारहाण करताना अनेक जण दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी पोलिसांवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हल्ला प्रकरणातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करणार असे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे.