नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांच्या उपस्थितीतच ओडिशा रेल्वे अपघाताबाबत (Odisha train accident) मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरोमंडल ही सर्वात उत्तम एक्स्प्रेस ट्रेनपैकी एक आहे. मी तीनदा रेल्वेमंत्रीपदावर होते. त्या अनुभवावरून सांगते की, मी हा जो अपघात पाहिला आहे त्यावरून असे वाटते की, 21व्या शतकातील हा सर्वात मोठा रेल्वेअपघात आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. रेल्वे सुरक्षा आयोगामार्फत या दुर्घटनेची चौकशी करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
#WATCH | At the site of #BalasoreTrainAccident, West Bengal CM and former Railways Minister Mamata Banerjee says, “Coromandel is one of the best express trains. I was the Railway Minister thrice. From what I saw, this is the biggest railway accident of the 21st century. Such… pic.twitter.com/aOCjfoCbvF
— ANI (@ANI) June 3, 2023
ममता बॅनर्जी यांनी आज, शनिवारी बालासोरमध्ये घटनास्थळाला भेट दिली. अशा प्रकारच्या दुर्घटनांचा तपास रेल्वे सुरक्षा आयोगाकडे सोपवला जातो आणि ते चौकशी करून अहवाल देतात, असे त्या म्हणाल्या. ट्रेनमध्ये टक्कर-रोधक उपकरण नव्हते, अशी माझी माहिती आहे. हे उपकरण गाडीत असते तर, हा अपघात घडला नसता, असे सांगून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांना परत आणणे शक्य नाही. पण आता बचाव कार्य आणि येथील स्थिती पूर्वपदावर आणणे यावर भर द्यावा लागेल. मदत आणि बचाव कार्यात आम्ही राज्य सरकार आणि रेल्वेला पूर्ण सहकार्य करू.
हेही वाचा – Sharad Pawar : रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी, सत्यता समोर येईल – पवार
हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. 1981मध्येही अशीच एक घटना घडली होती, असे सांगून ममता बॅनर्जी यांनी, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आमच्या राज्यातील लोकांच्या कुटुंबीयांना आम्ही प्रत्येकी 5 लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत अडीचशेहून अधिक जणांचा मृत्यू तर सुमारे 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने बैठक बोलावली, तसेच या बैठकीनंतर घटनास्थळाला भेट दिली.