भाजप विरोधकांनी आता लोकसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे. त्यासाठी सध्या जागा वाटपाच्या चर्चांना जोर चढताना दिसत आहे. पाच राज्यांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काँग्रेसच्या मनोबलामध्ये वाढ झाली आहे. पण, विरोधकांना देखील बळ मिळाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा धुळ चारायची यासाठी आता विरोधक रणनिती आखताना दिसत आहेत. काही महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यांमध्ये भाजपविरोधकांनी लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा देखील सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी देखील भाजपविरोधक एकत्र आले असून त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली आहे. दरम्यान, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत देखील काँग्रेसनं चर्चा सुरू केली आहे. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात वाद देखील आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील चर्चा कशा रितीनं पार पडते हे पाहावं लागणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयु, टीडीपी, तेलगु देसम पार्टी, आरजेडी, आरएसएलपी, नॅशनल कॉन्फरन्स यासारखे पक्ष भाजपविरोधात एकत्र आले असून भाजपला हरवणं हाच उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र विरोधकांच्या महाआघाडीची चेष्टा केली आहे. कुणीही काहीही करा आमचा विजय निश्चित आहे. तसंच भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. भाजपविरोधकांच्या सुरू झालेल्या चर्चेतून आता काय निष्पन्न होतं हे देखील पाहावं लागणार आहे. यापूर्वी एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्या असं आवाहन चेन्नईतील सभेत केलं होतं. पण, इतर पक्षांची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट नाही.