आजपासून ( बुधवार ) सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज गोंधळाशिवाय चालण्याची इच्छा सत्ताधारी एनडीएने आणि विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यात काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास प्रस्वाव मांडण्याचा निर्णय घेतल्याने सरकारवर दडपण असणार हे नक्की! दरम्यान एकेकाळी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या तेलगु देसम पार्टीने देखील सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचे ठरवल्याने या आव्हानांना सरकार कसे सामोरे जाते हे पाहावे लागणार आहे. केंद्र सरकारकडून नाराज झाल्याने आणि राज्याला विषेश राज्याचा दर्जा न मिळाल्याने एन. चंद्रबाबु नायडू यांच्या टीडीपीने भाजपची साथ सोडली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे काम सुरळीत पार पाडावे यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन केले आहे.
सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न
महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न, जम्मू – काश्मीरमधील राज्यपाल राजवट, जमावाकडून होणाऱ्या हत्या, इंधन दरवाढ,स्वीस बँकेतील काळ्या पैशामध्ये झालेली वाढ या मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार हे नक्की! दरम्यान, या मुद्यांवर एकत्रित चर्चा करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव हाच योग्य पर्याय असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेली शिवसेना देखील महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि काश्मीरमधील प्रश्न या मुद्यांवर विरोधकांना साथ देण्याची शक्यता आहे.
लोकसभा अध्यक्षांचे आवाहन
दरम्यान, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळावी असे आवाहन विरोधकांना केले आहे.