नवी दिल्ली – टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किंमतीवरुन एका मुलाखतीत टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना छेडले. यावर संतप्त झालेल्या स्मृती इराणींनी अँकरला तुम्ही तुरुंगात असताना काय झाले होते? असं मी विचारू शकते, असं म्हणत त्यांना तुरुंगाची आठवण करुन दिली आणि मुळ प्रश्नापासून सर्वांचेच लक्ष विचलीत केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘आज तक’ या राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर अँकर सुधीर चौधरी हे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लाइव्ह मुलाखत घेत होते. यावेळी अँकरने टोमॅटोचे दर 200 ते 300 रुपये किलो झाले असल्याची आठवण करुन देत, तुमच्या घरात या वाढत्या महागाईवर चर्चा होते का? असा प्रश्न विचारला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पारा चढला. त्यांनी अँकरलाच सुनावत म्हटले, “तुम्ही या मुद्याचे महत्त्व कमी करत आहे.” यावर अँकरने, “तुम्ही यावर आता चर्चा होत आहे, आधी होत नव्हती, असे व्हॉटअबाऊटरी करणार” असे म्हटले.
यामुळे संतप्त झालेल्या स्मृती इराणी म्हणाल्या, “सुधीरजी मी देखील तुम्हाला विचारु शकते की तुम्ही तुरुंगात असताना काय झालं होतं? आपल्याला जर मोकळेपणाने आणि मर्यादेत राहून चर्चा करायची असले तर माझ्या घरात काय चालतं हा काही राष्ट्रीय चर्चेचा विषय होऊ शकत नाही. ती माझी प्रायव्हेट स्पेस आहे.” असे उत्तर दिले.
यावर अँकरने स्मृती इराणींना पुन्हा आठवण करुन दिली, की तुम्ही एक मंत्री आहात. 250 ते 300 रुपये किलो टोमॅटोबद्दल तुम्ही किती संवेदनशील आहात आणि एक मंत्री म्हणून तुम्हीही तेच जीवन जगत आहात का? जे सर्वसामान्य भारतीय नागरिक भोगत आहे? याप्रश्नावर इराणींनी अँकरला त्यांच्याच कार्यक्रमांची आठवण करुन दिली. एक मिनीट 12 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज़िम्मेदारी और जवाबदेही ये दोनों शब्द मोदी सरकार की डिक्शनरी में है ही नहीं।#Smritiirani #टमाटर #सुधीर_चौधरी #तिहाड़_जेल pic.twitter.com/XAYQNxIE0J
— Netta D’Souza (@dnetta) August 19, 2023
स्मृती इराणी जेव्हा विरोधीपक्षात होत्या, तेव्हा त्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत 450 रुपये झाल्यामुळे रिकामे सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरत होत्या. कांदे, भाजीपाला दरवाढीवरुन केंद्र सरकारला दोष देत होत्या, त्या स्मृती इराणी आता केंद्रात सत्तेत असताना गॅस सिलिंडरचे दर 1160 रुपयांपर्यंत वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली आहे. भाजीपाला आणि डाळींच्या भाववाढीवर त्या संसदेतही बोलत नाही. यावरुन सामान्य नागरिकांमध्ये रोष असल्याचे दिसून येते आहे.