हैदराबाद : तेलंगणात येत्या 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे तेथील प्रचार टिपेला पोहचला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजवटीवर टीका केली होती. यावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, माध्यान्ह भोजन आणि हरितक्रांतीसारख्या पथदर्शी योजना राबवल्या जात असताना केसीआर कुठे होते? असा सवाल केला.
हेही वाचा – ‘ही’ एक विकृती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांना वाटत नाही, ठाकरे गटाचा पलटवार
नालगोंडा आणि आलमपूर येथे बुधवारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जाहीर सभा झाल्या. तेलंगणात इंदिरा गांधी यांची कल्याणकारी राजवट ‘इंदिराम्मा राज्यम’ परत आणण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. त्यावर केसीआर यांनी टिप्पणी केली होती. खर्गे यांनी या दोन्ही सभांमधून त्यांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेस नेते ‘इंदिरम्मा राज्यम’ परत आणण्याचे आश्वासन देतात, पण ते आणीबाणीचा काळ होता आणि दलितांची स्थिती ‘जैसे थे’च आहे, असे केसीआर यांनी मंगळवारी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना म्हटले होते.
KCR ग़रीबों के लिए काम नहीं करते !
एक दिन बोलते हैं।
एक बार कुछ करते हैं।
फ़िर हमेशा के लिए उस योजना को ख़त्म कर देते हैं।तेलंगाना में तीन पार्टीयाँ एक तरफ़ हैं और कांग्रेस पार्टी ग़रीबों की तरफ़ है।
हम ग़रीबों के हक़ लिए लड़ते हैं।
📍नालगोंडा, तेलंगाना pic.twitter.com/JT0UgzJ6JD
— Mallikarjun Kharge (@kharge) November 22, 2023
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्याव्यतिरिक्त, हरित क्रांती, गरीबांसाठी 20 कलमी कार्यक्रम तसेच अन्य मोठे कार्यक्रम इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत राबवले गेले, याकडे खर्गे यांनी लक्ष वेधले. हे केसीआर इंदिरा गांधी यांनाही शिव्या देतात. इंदिरा गांधींच्या राजवटीत गरिबीबद्दल केसीआर प्रश्न उपस्थित करतात. हरित क्रांती आणि माध्यान्ह भोजन योजना आणल्या, तेव्हा तुम्ही कुठे होता आणि काय करत होता? केसीआर याचे उत्तर देणार नाहीत, परंतु “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसून फक्त शिवीगाळ करतील, असे त्यांनी सुनावले.
तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या असून केसीआर कुटुंबाच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस ही निवडणूक लढत आहे, असे सांगून खर्गे म्हणाले, गरिबांच्या जमिनी हिसकावून घेणाऱ्यांविरुद्ध आम्ही लढत आहोत. तेलंगणातील जनतेला जो विकास हवा होता, तो झालेला नाही. ना रस्ते बांधले, ना शाळा उभ्या केल्या आणि सिंचन प्रकल्पही बांधले गेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळ्यांचा ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच… ठाकरे गटाची बोचरी टीका
काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन तेलंगणातील जनतेला करताना खरगे म्हणाले, आपल्या फार्महाऊसमध्ये बसून केसीआर निर्णय घेतात, पण कधीही लोकांना भेटत नाहीत. जे कधीच लोकांना भेटत नाहीत आणि लोकांमध्ये मिसळत नाहीत त्यांनी कधीही मतदान करू नये. तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यास तोच कल देशाच्या इतर भागांमध्ये राहील.
केसीआर, भाजपा तसेच असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम हे एकमेकांचे मित्र आहेत आणि तिन्ही पक्ष काँग्रेसच्या विरोधात कट रचत, एकत्र काम करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. केसीआर जेव्हा नागपुरातील आरएसएस मुख्यालयाला भेट देतात, तेव्हा ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची मैत्री दर्शवतात आणि ओवैसी केसीआर यांचे वारंवार कौतुक करतात. आपण त्यांचे (केसीआर) चांगले मित्र असल्याचे ते सांगत असल्याकडेही खर्गे यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा – राज्यातील शेतकऱ्यांना समाधानी करण्याची शक्ती विठुरायाने द्यावी – देवेंद्र फडणवीस