दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. पेगॅसस प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र डागताना आणीबाणीपेक्षा पेक्षा गंभीर परिस्थिती असून आता संपूर्ण देशात खेला होबे होणार असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसंच, फोन हॅकबद्दल बोलताना माझा, प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांचा फोन हॅक करण्यात आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहिलेलं नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
पेगॅसस हा एक धोकादायक वायरस आहे, ज्याद्वारे आपली सुरक्षा धोक्यात आणली जात आहे. संसदेतही कामकाज होत नाही आहे, विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. आपत्कालीन परिस्थितीपेक्षा या वेळची परिस्थिती अधिक गंभीर आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
विरोधकांच्या एकजूटीवर काय बोलल्या ममता?
विरोधी पक्षाच्या ऐक्याबाबत ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं. ही संपूर्ण व्यवस्था राजकीय पक्षांवर अवलंबून आहे, जर कोणी नेतृत्व केलं, तर मला काही हरकत नाही. मला माझे मत कोणावरही लादायचं नाही आहे. आता बर्याच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, आम्ही संसदेच्या अधिवेशनानंतर सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करू, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
‘आता देशभर खेला होबे’
ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की मी सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांना भेटणार आहे. लालू यादव यांच्याशीही चर्चा झाली आहे. सर्वांना एकत्र यायचं आहे. सोनिया गांधींनाही विरोधी ऐक्य हवं आहे, आम्ही त्यांच्यासोबत बैठकीत यावर चर्चा करू, असं ममता बॅनर्जींनी सांगितलं. सर्वांनी विरोधकांच्या आघाडीवर गांभीर्याने काम केलं तर ६ महिन्यांत निकाल दिसू शकेल, असा विश्वास ममतांनी व्यक्त केला.
सर्व विरोधी नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत, जर विरोधकांचं राजकीय वादळ आलं तर कोणीही हे रोखू शकणार नाही. आता ‘खेला होबे’चा आवाज देशभर ऐकू जाणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.