भारतीय जवानांच्या तर्कतेमुळे दहशतवाद्यांकडून उरीसारखा मोठा हल्ला पुन्हा करण्याचा कट उधळण्यात यश आले आहे. १८ सप्टेंबरला ६ दहशतवादी उरीमध्ये भारतीय नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत होते. याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. तेव्हापासून या दहशतवाद्यांच्या शोधासाठी भारतीय लष्कराने विशेष ऑपरेशन राबवले होते. उरी सेक्टरमध्ये केलेल्या एका मोठ्या ऑपरेशनदरम्यान सैन्याने ही कारवाई केली आहे. यादरम्यान सोमवारी संध्याकाळी लष्कराने या दहशतवाद्यांना पकडले आहे. लष्कराने ९ दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा केला तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केल आहे. अली बाबर पात्रा असं या पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नापाक कुरापत्या हाणून पाडल्या आहेत.
याचदरम्यान ४ दहशतवाद्यांनी पाकिस्तानात पळ काढला आहे. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेला दहशतवादी पाकिस्तानचा रहिवासी असून लष्कर-ए-तौय्यबाचा तो सदस्य आहे. भारतीय सुरक्षा दलाने जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात ७ AK-क्लास रायफल्स, ९ पिस्तूल, ८० हून अधिक ग्रेनेड आणि भारतीय-पाकिस्तानी चलनाचा समावेश आहे.
या कारवाईसंदर्भात मंगळवारी भारतीय लष्कराकडून पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. १८ सप्टेंबर रोजी सैन्याला उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले दहशतवादी आढळून आले होते. यावेळी ६ पैकी ४ दहशतवादी सीमेपलीकडे होते, तर २ दहशतवादी भारतीय सीमेत दाखल झाले होते.