घरसंपादकीयदिन विशेषकवी, कथाकार ग. दि. माडगूळकर

कवी, कथाकार ग. दि. माडगूळकर

Subscribe

गजानन दिगंबर माडगूळकर हे विख्यात मराठी कवी व पटकथा-संवाद लेखक होते. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी शेटेफळ या गावी झाला. त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध याठिकाणी झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात काम केले. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला.

‘हंस पिक्चर्स’ या चित्रसंस्थेच्या, मास्टर विनायक दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ (१९३८) या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून त्यांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. नवयुग चित्रपट लिमिटेड या चित्रसंस्थेत नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले.

- Advertisement -

पुढे नवहंस पिक्चर्सच्या ‘भक्त दामाजी’(१९४२) आणि ‘पहिला पाळणा’ (१९४२) या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर ‘राम जोशी’ (१९४७) या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहिली त्यात एक भूमिकाही केली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले.

कविता-‘जोगिया’ (१९५६),‘चार संगीतिका’ (१९५६),‘काव्यकथा’(१९६२),‘गीत रामायण’(१९५७), ‘गीत गोपाल’(१९६७), ‘गीत सौभद्र’(१९६८). कथासंग्रह-‘कृष्णाची करंगळी’(१९६२),‘तुपाचा नंदादीप’ (१९६६), ‘चंदनी उदबत्ती’(१९६७). कादंबरी-‘आकाशाची फळे’(१९६०). आत्मचरित्रपर-‘मंतरलेले दिवस’(१९६२) आणि ‘वाटेवरल्या सावल्या’ (१९८१). इत्यादी उल्लेखनीय पुस्तके त्यांनी लिहिली. माडगूळकरांचे गीत रामायण विशेष संस्मरणीय ठरले. अशा या प्रतिभावान साहित्यिकाचे १४ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -