घरसंपादकीयदिन विशेषसमाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे

समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे

Subscribe

महर्षी धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी कोकणातील मुरुड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे झाले. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बीए झाले. त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतर त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.

पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) त्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. या पुनर्विवाहामुळे त्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले, पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ मध्ये त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली ‘अनाथ बालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे १९०० पासून हा आश्रम सुरू झाला.

- Advertisement -

पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संबद्ध अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. महर्षी कर्वे यांचा भारत सरकारने पद्मविभूषण (१९५५), भारतरत्न (१९५८) या पदव्या देऊन गौरव केला. अशा या थोर समाजसुधारकाचे ९ नोव्हेंबर १९६२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -