घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि बहु दिवस वोळगावा । कां अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥
म्हणून, पुष्कळ दिवस त्याची सेवा करावी किंवा समय पाहून त्याची विनवणी करावी, इतकादेखील प्रयास त्या दैववान अर्जुनाला पडला नाही!
हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें आंगीं । न ठकती माझ्या ॥
श्रोते म्हणतात,‘हे असो, आता पुढे कथाभाग लवकर सांगा.’ तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, अर्जुन लडिवाळपणाने म्हणतो की, ‘देवा, तुम्ही ही जी संतांची लक्षणे सांगितली, ती माझ्या अंगी वसत नाहीत;
एर्‍हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडे कीर अपुरा । परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥
एरव्ही या लक्षणाचे तात्पर्य जाणण्यात मी खरोखर अयोग्य आणि अपुरा असा आहे; परंतु तुमच्या सांगण्याने जर मला योग्यता आली तर येईल.
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होइजेल । काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल जें ॥
जर तुम्ही मनात आणले, तर मी ब्रह्मसुद्धा होईन! तुम्ही ज्याचा मला अभ्यास करावयास सांगाल, तो करण्याला मला काय अशक्य आहे?
हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघिजत असों अंत:करणीं । ऐसी जहालेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥
ही तुम्ही कोणाची गोष्ट सांगितली, हे मला काही कळत नाही, परंतु ती ऐकल्यापासून तिची स्तुती करावी असे अंतःकरणात वाटते. तर ही योग्यता ज्याच्या अंगात असेल, त्याच्या आनंदास पारावारच नाही!
हें आंगें म्यां होइजो का । येतुलें गोसावी आपलेपणें कीजो का । तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां । करूं म्हणती ॥
प्रभो, याचप्रमाणे माझे अंगी योग्यता येईल एवढे आपण कराल काय? तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले की, हो, तुला आम्ही ब्रह्मरूपी करू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -