घरफिचर्ससारांशविदेश यात्रा

विदेश यात्रा

Subscribe

लोकांना वाटतं बाहेरच्या देशात फिरायला जायचं म्हणजे आपल्याकडे वेस्टर्न आऊटफिट्स असावेत. ही एक उगीचच आपल्या मनाची धारणा आपण बनवून ठेवली आहे. ते नसले तर लोक काय म्हणतील? आपण आपल्या पंजाबी ड्रेसमध्ये गेलो किंवा साडीमध्ये गेलो, तर लोक आपल्याला हसतील. अशी एक मानसिक धारणा आपल्याच मनात आणि आपणच निर्माण केलेली असते, तर तिकडे जायचं म्हणजे लगेच छोटे छोटे स्कर्ट्स, शॉर्ट, पण मग पुरुषीही खरेदी करतात. ते मागे राहत नाहीत. तेही असेच काहीसे कपडे घेऊन अशा प्रवासाला निघत असतात.

–अर्चना दीक्षित

अहो हा तर खरंच पेचात पाडणारा प्रश्न आहे, पण म्हटलं आज या लेखाच्या निमित्ताने तुम्हालाच विचारूयात याचं काही उत्तर तुमच्याकडे आहे का? किंवा तुम्ही शोधून मला काही सांगू शकता का? त्याचं काय झालं. मला ही जरा फॅशनच कळली नाही, असं म्हणालं तरी चालेल किंवा ही फॅशन म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. कदाचित हा लेख वाचल्यावर तुम्हाला उत्सुकता असेल असं मला वाटतं.

- Advertisement -

तर होतं काय आजकाल आपल्यापैकी अनेक जणांना नोकरीनिमित्ताने, कामानिमित्ताने, व्यवसायनिमित्ताने, एवढेच काय साधं फिरायला जायचं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जायची संधी मिळत असते आणि गेले पाहिजे. कारण जर त्यामुळे आपली प्रगती असेल किंवा नवीन नवीन भाग बघून आपल्याला नवीन काही शिकायला मिळत असेल, तर मी म्हणते, का नाही अशा संधीचा फायदा घ्यायचा? बिलकुल घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल, की मग यात फॅशनचे काय म्हणजे ते मी इथे फॅशन का जोडली आहे? हा तुम्हाला नक्कीच प्रश्न असेल ना. सांगते सांगते, म्हणजे लिहिते लिहिते.

तर होतं काय अशा जेव्हा संधी आपल्याला येतात, देशात काय किंवा विदेशात काय जेव्हा दौर्‍यावर जायची आपल्याला संधी येते, त्या संधीचा आपण फायदा घेत असतो. पण मग ही जी फॅशन मी म्हटलं ती सुरू होते. आता ती म्हणजे काय हे सांगायला मला नक्कीच आवडेल या ठिकाणी. तर ती म्हणजे जेव्हा अशी संधी येते, तेव्हा आपण ताबडतोब आपलं कपाट नीट न बघता लगेचच बाहेर दुकानांमध्ये खरेदीसाठी पळतो. काय घेऊ आणि काय नाही असा आपल्यासमोर एक मोठा प्रश्नच असतो. खरे तर या प्रश्नाची काय गरज? उत्तरं जेव्हा आपल्याकडे असतात, पण नाही आपल्याला असं वाटतं, आपण फिरायला जातोय म्हणजे काहीतरी नवीन खरेदी करूनच जायचं. अशी एक उगाचच मनात धारणा असते आपल्या.

- Advertisement -

बरं अशा ठिकाणी मी समजू शकते हो की ऋतूप्रमाणे फिरायला जायचं असेल तर त्या ऋतूनुसार आपल्याकडे कपडे पाहिजेत. मान्य आहे ना मला. अगदी बरोबर आहे. म्हणजे थंडीच्या ठिकाणी जायचं असेल तर तिथे थंडीच्या दृष्टीने शॉल, स्वेटर, मफलर, स्कार्फ अशा अनेक गोष्टींची गरज असते आणि ती खरेदी करावीच लागते. ती केलीदेखील पाहिजे. एखाद्या ठिकाणी जाणार असू तर त्यानुसार खरेदी केली पाहिजे हेही मला मान्य, पण काय होतं काय माहिती लोकांना. म्हणजे मी नुसतं भारताविषयी बोलत नाहीये. तर लोकांना वाटतं बाहेरच्या देशात फिरायला जायचं म्हणजे आपल्याकडे वेस्टर्न आऊटफिट्स असावेत. ही एक उगीचच आपल्या मनाची धारणा आपण बनवून ठेवली आहे. ते नसले तर लोक काय म्हणतील? आपण आपल्या पंजाबी ड्रेसमध्ये गेलो किंवा साडीमध्ये गेलो, तर लोक आपल्याला हसतील.

अशी एक मानसिक धारणा आपल्याच मनात आणि आपणच निर्माण केलेली असते. तर तिकडे जायचं म्हणजे लगेच छोटे छोटे स्कर्ट्स, शॉर्ट, पण मग पुरुषीही खरेदी करतात. ते मागे राहत नाहीत. तेही असेच काहीसे कपडे घेऊन अशा प्रवासाला निघत असतात. मी बरोबर आहे की चूक आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण मला हाच एक प्रश्न पडतो की आपण जो पेहराव घालतो, ज्यामध्ये आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत, पण कम्फर्टेबल आहोत, तर तोच पेहराव घालून आपण का नाही फिरू शकत? हं त्या पेहरावात नीटनेटकेपणा आहे की नाही, हे नक्कीच बघा. त्याबद्दल माझं बिलकुल दुमत नाही. म्हणजे अगदीच म्हणतो ना आपण अगदी गजागळपणे नका जाऊ, पण तो पेहराव चुकीचा नाही, हेही तितकंच लक्षात ठेवा, असं मला वाटतं. शेवटी प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असत, आणि असावंदेखील.

ही फॅशन करताना कधी कधी असंही होतं की, आपण जर त्या पेहरावामध्ये कम्फर्टेबल नसू, तर नवीन ठिकाण बघण्याच्याऐवजी सगळं लक्ष त्या कपड्यांमध्येच असतं. हो की नाही? खरं आहे ना माझं म्हणणं? मागे एकदा माझ्या मैत्रिणीने सांगितलेला किस्सा मला अगदी आवर्जून आठवतो. तिचे पती एक मोठे अधिकारी आहेत आणि त्यांची बदली बाहेरच्या देशात झाली होती. तर बाहेरच्या देशात तिने अगदी स्ट्रिक्टली ठरवलं होतं की आपण आपली अ‍ॅटलिस्ट जेव्हा फंक्शन्स असतील, समारंभ असतील, तेव्हा साडीच नेसायची. बरं साडी नेसण्यासाठीदेखील वेगवेगळ्या पद्धती आहेत की. टिपिकल साडी नेसलीच पाहिजे असं कोणी सांगितलं? त्याच्या अनेक स्टाईल्स आहेत. तर ती पूर्णपणे त्या देशात समारंभाच्या वेळी साडी नेसून जात असे.

सुरुवातीला विदेशातल्या लोकांना हे जरा नवलच किंवा वेगळच वाटलं, पण ज्यावेळी त्या साडीमधली त्या पेहरावामधली सादगी आणि ते असूनदेखील इतर भाषांमध्ये नैपुण्य असणारी ती माझी मैत्रीण काय उठून दिसत होती आणि खोटं वाटेल ज्यावेळी माझ्या मैत्रिणीची बदली तिथून झाली, तेव्हा तिच्या फेअरवेलसाठी ते सगळे विदेशी लोकं भारतीय पेहराव घालून आले होते. तर मला तेच म्हणायचंय, मी असं म्हणत नाही की दरवेळेस तुम्ही साडी नेसून किंवा दरवेळेस भारतीय पेहराव घालूनच तुम्ही जा, पण एक आपल्या पेहरावाला योग्य ती मर्यादा ठेवावी असं मला नक्कीच वाटतं आणि आपल्या पेहरावाला कमी लेखू नये हेही मला अगदी आवर्जून वाटतं. काय मग चांद्रयान, सूर्ययान पाठवणार्‍या ज्या आपल्या वैज्ञानिक महिला आहेत, त्यांचा आदर्श ठेवून ‘हम भी किसीसे कम नही’, म्हणूयात ना आपण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -