देशभरात, महाराष्ट्रात आणि मुंबईत एकीकडे भाजपप्रणीत एनडीएचाच बोलबाला दिसत असताना दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत चर्चा झालेल्या इतर फॅक्टरचं काय होणार? त्यांचा निकालांवर काय परिणाम होणार त्याविषयी मोठी उत्सुकता होती. त्यातलाच एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वंचित बहुजन आघाडी. निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २२ तारखेला वंचित बहुजन आघाडी ४८ जागांवर निवडून येऊ शकते, अशा प्रकारचं वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. मात्र, मतमोजणी सुरू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार औरंगाबाद वगळता कुठेही आघाडीवर नाहीत. इतकंच काय, पण ते कुठे दुसऱ्या क्रमांकावर देखील नाहीत. काही ठिकाणी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर त्यांचे उमेदवार दिसत आहेत. खुद्द प्रकाश आंबेडकर देखील तिसऱ्या फेरीनंतर किमान लाखभर मतांनी संजय धोत्रेंपेक्षा पिछाडीवर आहेत. त्यामुळे एकूणच वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या तुफान चालणाऱ्या प्रचारसभा हा फुसका बारच ठरला असल्याचं स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – चंद्रपूरमध्ये भाजपाचे हंसराज अहिर पिछाडीवर
इम्तियाज जलील डार्क हॉर्स?
औरंगाबादमध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत एमआयएमचे इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. त्यामुळे चंद्रकांत खैरेंच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असणार यात शंकाच नाही. शिवाय, त्या दोघांमध्ये जरी १५ ते २० हजारांचाच फरक असला, तरी इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये डार्क हॉर्स ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रकाश आंबेडकर स्वत:देखील पिछाडीवर
दुसरीकडे स्वत: प्रकाश आंबेडकर तिसऱ्याच फेरीमध्ये तब्बल लाखभर मतांनी पिछाडीवर पडले आहेत. आणि तेही दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून. तर अकोल्यातही संजय धोत्रेंच्या आणि त्यांच्या मतांमध्ये १ लाख ३० हजार मतांचा फरक दिसत आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच ही सगळी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असल्याचं किमान तिसऱ्या फेरीनंतर तरी पाहायला मिळत आहे.