दिल्ली येथे पार पडलेल्या तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात अनेक जण एकत्र आले होते. त्यातील महाराष्ट्रातील ५८ तबलीगी बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध सुरु असताना त्यातील ४० जण आज सापडले असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून इतर १८ जणांचा सध्या शोध सुरु आहे. या ५८ तबलीगींनी फोन बंद करुन ठेवल्यामुळे त्यांना शोधणे कठीण झाले होते. परंतु, त्यांना शोधण्यास पोलिसांना यश आले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
४० जणांना केले क्वॉरंटाईन
महाराष्ट्रातील ५८ जणांपैकी ४० जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले असून इतर १८ जणांचा सध्या शोध सुरु आहे. हे सर्व भारतीय असून या ४० जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार असून त्या चाचणीत जर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांची सरकारी प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना सोडण्यात येणार आहे.
१५० तबलीगींविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्रातून तब्बल १ हजार ४०० च्या जवळपास नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले. यापैकी १५० जण मुंबईतील होते. या कार्यक्रमात विदेशातूनही अनेक जण आले होते. दरम्यान, संचारबंदी असताना देखील त्याबाबत माहिती लपवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी १५० तबलीगींविरोधात गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा – मी तर फकीर, धमक्या कुणाला देता? भाजपा प्रदेशाध्यक्षांचे प्रत्युत्तर!