मुंबई : गेल्यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील ने्यांचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यावरून माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी, आता स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी अशी लढाई असेल, असे म्हटले आहे.
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न –
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 2, 2023
वर्षभरापूर्वी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सरकारने दोन दिवसांपूर्वी वर्षपूर्तीचा सोहळा साजरा केला. त्यानंतर आज, रविवारी पुन्हा एकदा राजकारणात भूकंप झाला असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थक 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सहभागी झाला आहे.
या राजकीय घडामोडींसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्त्वाचे प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागले. पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्ने पडत होती, त्यांना एक वर्ष उलटल्यावरही काय मिळाले? असा पहिला सवाल त्यांनी केला आहे. रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होत आहे, असे सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदे मिळाल्यावर यांचे काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी? असा बोचरा प्रश्न त्यांनी केला आहे.
हेही वाचा – Sharad Pawar : मंत्रिमंडळात घेऊन राष्ट्रवादीला मोदींनी क्लिनचीट दिली; शरद पवारांचा टोला
एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, “145 जागा जिंकायच्या असतील तर यांना सोबत घ्या”, असे वरिष्ठांनी सांगितले. म्हणजे हे सिद्ध झाले आहे की ‘मिंधें’कडे क्षमताच नाही! नाहीतर एवढे गद्दारांचे बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला? असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आणि सर्वात महत्वाचे… आम्ही काँग्रेस आणि एनसीपीसोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, असे म्हटले गेले. मग आज भाजपाने काय केले? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना! असे सांगत त्यांनी भाजपावर शरसंधान केले आहे.
एक सिद्ध झाले, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! आता ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.