राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात वाद सुरु असल्याची चर्चा आहे. यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजित पवार यांनी या वादात काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत. उलट मीच तापट स्वभावाचा आहे. त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादाच्या चर्चेत काहीच तथ्य नाही, असं सांगत अजित पवार यांनी पाटील-कुंटे वादावर पडदा टाकण्याच प्रयत्न केला आहे.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील करोना परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील-कुंटे वादावर भाष्य केलं. जयंत पाटील शांत स्वभावाचे आहेत. उलट मीच तापट स्वभावाचा आहे. जयंत पाटील हे अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागतात. ते गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री होते. त्यांना अधिकाऱ्यांशी कसे वागायचे हे चांगले माहीत आहे. त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले.
या बातम्या कशा आल्या, कधी आल्या माहिती नाही. ज्याला महत्त्व द्यायला नको, त्यालाच आपण महत्त्व देतोय. त्यामुळे लोकांच लक्ष तिकडे जातं. माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की, यामध्ये काही तथ्य नाही. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसंच मुख्य सचिव आणि अधिकारी. आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाही, अनेक वर्ष आम्ही प्रशासन चालवलं आहे, असं म्हणत अजित पवार म्हणाले.