नागूपर – महापुरुषांच्या अपमानप्रकरणी राज्यात राजकारण तापलेलं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपल्या देशाला दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या अभिरुप न्यायालयात त्या बोलत होत्या.
अमृता फडणवीस यांनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते. त्यावेळी हलकल्लोळ माजला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या अनेक नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान होत आहे. त्यातच, अमृता फडणवीस यांचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.
हेही वाचा – मुंबईकरांसाठी पाणीही महागलं; झोपडपट्टी, चाळी, इमारतींसाठी किती असणार पाणीपट्टी?
‘मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाही. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही,’ असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
अमृता म्हणाल्या की, मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते. मी राजकीय वक्तव्य जास्त करीत नाही. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे.
हेही वाचा – अनिल देशमुखांच्या जामिनावरील स्थगिती याचिकेवर आज सुनावणी
माझी तक्रार करण्यात आली
मी खूप बोलते, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काही बदल केले नाही, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
राजकारणात यायचे नाही
देवेंद्र फडणवीस राजकारणासाठी २४ तास देतात. मी देऊ शकत नाही. त्यामुळे मला सध्या राजकारणात रस नाही, असंही अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
देशाचे राष्ट्रपिता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६९ व्या जन्मदिनानिमित्त ट्विटरवर केलेल्या पोस्टवर अमृता फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता.