सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांच्या कर्जाबाबत आयकर विभागाने चौकशी सुरु केली आहे. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयकर विभागाकडून होत असलेली कारवाई राजकीय द्वेषातून असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठीचं मतदान तोंडावर आल्याने राजकीय भूमिकेतून ही कारवाई होत असल्याचा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी केला.
“जे काही कर्जपुरवठा संदर्भामध्ये कागदपत्रे दिली आहेत ती कायदेशीर आहेत. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार त्यामध्ये नाही आहे. मतदान ३० ऑक्टोबरला आहे. त्यामुळे जे काही सुरु आहे ते राजकीय भूमिकेतून सुरु आहे. महाराष्ट्रात सुरु आहे देशभर सुरु आहे, त्याचाच हा भाग असावा असा माझा अंदाज आहे,” असं अशोक चव्हाण म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी ते कुणाचे व्यक्तीगत कारखाने नाहीत, सहकारी साखर कारखाने आहेत, असं सांगितलं. तसंच, जे काही कर्ज ज्या वित्तीय संस्थेकडून घेतलं आहे ते पूर्णपणे नियमित घेतलं आहे. त्यात कुठलाही गैरप्रकार नाही, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
बुलढाणा अर्बन पंतसंस्थेची आयकर विभागाकडून चौकशी
बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात बुधवार दुपारपासून आयकर विभागाचं अकरा जणांचं पथक चौकशी करत आहेत. बुलढाणा अर्बन पतसंस्थेने अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील चार कारखान्यांना कर्ज दिलं आहे. या चार कारखान्यांसंदर्भात ही चौकशी केली जात असल्याची माहिती बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली. गेल्या २४ तासापासून पथक चौकशी करत आहेत. सुभाष शुगर हातगाव, एम व्ही शुगर उमरी आणि भाऊराव शुगर १, भाऊराव शुगर २ हे नांदेड येथील चार कारखाने आहेत. या कारखान्यांना दिलेल्या कर्जाशी संबंधित आयकर पथक चौकशी करत आहेत.
हेही वाचा – अशोक चव्हाणांशी संबंधित साखर कारखाने आयकर विभागाच्या रडारवर