सर्वसामान्यांपुढील महागाई, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था असे प्रश्न बाजूला पडले असून सध्या देशभरात अयोध्येत काय झाले, हनुमान चालीसा म्हणणे हे मुद्दे महत्त्वाचे वाटू लागले आहेत. अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की केंद्रातील सरकारला जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यानेच लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मांध विचारांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. कोल्हापूरमध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला. पवार म्हणाले की, देशात दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूच्या किमती वाढत चालल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती कुठवर जाऊन पोहोचल्या आहेत. याचा त्रास केवळ वाहन असणार्यांनाच होतो असे नाही, इंधनाशी निगडित सर्वच वस्तू यामुळे महाग होतात. या सगळ्याची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागते. मात्र ज्यांच्या हाती देशाची सूत्रे आहेत, ते याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत.
आज केंद्रामध्ये मोदींचे सरकार आहे. या सरकारनेच जनतेला महागाई आणि बेरोजगारी हटवण्याची आश्वासने दिली होती. परंतु ही आश्वासने पूर्ण करण्यात त्यांना शंभर टक्के अपयश आले आहे. याची किंमत जनता योग्य वेळी वसूल करतील. जनता केवळ बंडच नव्हे, तर याविरोधात चळवळी करतील, असा इशाराही शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.