भाजप – शिवसेनेची युती होणार की नाही? यावर बराच खल झाल्यानंतर अखेर व्हॅलेंटाईन्स डे’चा मुहुर्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आता युतीची चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. गेल्या अनेकदिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर अखेर भाजपने एक पाऊल पुढे टाकत युतीची चर्चा सुरु केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी युती झाली तरी शिवसेनाचा मोठा भाऊ असणार असे सांगितले आहे. ‘महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल’, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. त्याचबरोबर पंतप्रधानपदी कोण असेल हे देखील शिवसेनाच ठरवेल असे देखील ते म्हणाले होते. तसेच सामनामधूनही वारंवार सरकारवर निशाणा साधण्यात येत होता. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर चौफेर टीका करत होते. त्यामुळे आता युतीची चर्चा सुरु झाल्यास ही टीका काही काळ थांबेल, अशी अपेक्षा आहे.
हे वाचा – राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ राहणार – संजय राऊत
युती होणार का नाही? याची चिंता दोन्ही पक्षातील लोकांना लागलेली होती. शिवसेनेच्या ग्रामी भागातील खासदारांनी ही चिंता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा व्यक्त केली होती. युती लवकरात लवकर झाल्यास त्याप्रमाणे दोन्ही पक्षातील खासदारांना प्रचार करायला वेळ मिळणार आहे. याच प्रकारची अवस्था भाजप खासदारांची देखील झाली होती. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून युती करण्यासाठी दबाव वाढत होता.