‘एका निवडणुकीने लोकांना इतकी ताकद दिली की ते काहीही करू शकतील आणि कुणालाही मारू शकतील. रामाच्या नावाखाली मॉब लिंचिंग करणं हा हिंदू धर्माचा आणि प्रत्यक्ष रामाचाच अपमान आहे’, अशी परखड टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली आहे. पुण्यामध्ये काँग्रेसभवनमध्ये आयोजित केलेल्या ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या बियॉण्ड पॉलिटिक्स या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मॉब लिंचिंगच्या अनेक घटनांचे दाखले देत भाजप सरकारवर निशाणा साधला. गेल्या ६ वर्षांमध्ये या घटना वाढल्या असल्याचं देखील ते म्हणाले.
‘कुणालाही मारण्याची ताकद?’
यावेळी गेल्या काही वर्षांत घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांचा उल्लेख शशी थरूर यांनी केला. ‘हे सगळं सुरू झालं पुण्यात मोहसीन शेखच्या हत्येपासून. त्यानंतर बीफ असल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाकला मारण्यात आलं. नंतर सिद्ध झालं की ते बीफ नव्हतं. पण जरी जे बीफ असतं, तरी एखाद्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?’ असं थरूर या वेळी म्हणले. ‘याशिवाय पहलू खानकडे गायींना डेअरीसाठी लॉरीमध्ये नेण्याचा रीतसर परवाना होता. पण त्याला मॉब लिंचिंगमध्ये जीवे मारण्यात आलं. एकाच निवडणुकीने लोकांना इतकी ताकद दिली की ते काहीही करू शकतात आणि कुणालाही मारू शकतात. हा आपला भारत आहे का? मीही हिंदू आहे, पण असा नाही. या लोकांना मारताना त्यांच्यावर जय श्री राम म्हणण्याची बळजबरी करण्यात आली. हा हिंदू धर्माचा अपमान आहे. भगवान रामाचा अपमान आहे’, असं देखील थरूर म्हणाले.
Shashi Tharoor: Is this our Bharat? Is this what Hindu Dharam says? I am a Hindu but not of this kind. Also, while killing people, they are asked to say ‘Jai Sri Ram’. It is an insult to Hindu Dharma. It is an insult to Lord Ram that people are being killed using his name. pic.twitter.com/30FyKel2aO
— ANI (@ANI) September 22, 2019
Viral Video – लष्करी अधिकाऱ्याशी हात मिळवला आणि मोदी खाली वाकले!
आगामी विधानसभा निवडणुकांची शनिवारी निवडणूक आयोगाने घोषणा केली असून आता निवडणुकांच्या दृष्टीने प्रचार, आरोप-प्रत्यारोप आणि घोषणांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी केलेली ही टीका भाजप आणि काँग्रेस यांच्यातल्या वादाला नवी फोडणी देणारी ठरू शकेल.