काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही, असं ट्विट करत काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस व्यतिरिक्त आघाडी तयार करण्याचा विचार करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या ट्विटमध्ये अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असं देखील म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात तिसरी आघाडी तयार करण्यासंदर्भात चर्चा केली. काँग्रेस व्यतिरिक्त तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांचा दिसतोय. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेसशिवाय भाजपला हरवणं हे केवळ स्वप्न आहे. भाजपला सक्षम पर्याय हा काँग्रेसच आहे, असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
Congress has the biggest and the most precious treasure of democratic values and an all-inclusive progress with it. There is no need to fear. Over all these times, We have always walked straight with our inclusiveness being our biggest strength.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 2, 2021
विरोधकांनी भाजपला बळ देणारे राजकारण करू नये
लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा आणि तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा खासदार सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल.
मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही.