देशभरात सध्या कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. देशातील आठ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिला क्रमांकावर असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रित होत असतानाच अचानक ग्रामीण भागात कोरोना वाढू लागला. त्यामुळे हळूहळू महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली. सध्या मुंबईत सुद्धा गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांमध्ये हजाराने वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाचे प्रमाण इतक्या झपाट्याने का वाढू लागले आहे? याचा आढावा केंद्रीय पथकाने घेतला. केंद्रीय पथकाच्या आढावा अहवालातून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचे वाढत्या प्रमाणाचे कारण लग्नसराई आणि लोकल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा महाराष्ट्रात कठोर निर्बंध घातले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचं नेमकं कारण?
महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर अनेक सेवा सुरू करण्यात आल्या. लग्न समारंभ, धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली. तसेच लोकल देखील टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. पण याच कारणामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लोकांचा वाढलेला हलगर्जीपण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ, लोकल आणि सार्वजनिक वाहतूक यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला, असल्याचे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले. तसेच कोरोना चाचणी करणारी आरोग्य यंत्रणा सुस्तावल्याचा ठपका राज्य सरकारवर पथकाने ठेवला आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी येत्या तीन-चार दिवसातील रुग्णसंख्येचा आढावा घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
काल (सोमवारी) झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नियमांच्या कठोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येचा आढावा घेऊन राज्य सरकार तीन-चार दिवसांत कठोर निर्बंधाचा निर्णय घेण्याची शक्यता सांगितली जात आहे.
हेही वाचा – Corona Update: देशात सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार पार!