महाराष्ट्रात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १९ वर गेली असतानाच राज्य सरकारने गर्दी करणारे सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २५ तारखेचा गुढीपाडवा मेळावा रद्द केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंची पक्षाच्या नव्या रुपासंदर्भातली भूमिका ऐकण्यासाठी मनसेचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि जनतेला थांबावं लागणार आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी आकर्षित करणारे सांस्कृतिक, राजकीय, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश दिल्याचं शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द झाल्याचं स्पष्ट होत आहे.
‘कोरोना’चं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत.
तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात. pic.twitter.com/DWbkrjLBTQ— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 14, 2020
‘करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २५ मार्च रोजी होणारा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे’, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राज ठाकरे या मेळाव्यामध्ये पक्षाची भूमिका मांडणार होते. त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मनसे भाजपच्या बाजूला झुकणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार? हा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता मेळावाच रद्द झाल्यामुळे राज ठाकरेंची भूमिका ऐकण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.