मुंबई : भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नकार दिला आहे. परंतु, त्याच भाजपाने दाऊदचा हस्तक असलेल्या इकबाल मिरची याच्याशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलांबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे या मुद्द्यावरून ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नैतिकतेचे ऑडिट करणे गरजेचे आहे, असे म्हटले असून याच नैतिकतेच्या मुद्द्यावर सामनातील अग्रलेख देखील लिहिण्यात आला आहे. परंतु, ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या टीकेला भाजपाने उत्तर दिले आहे. X या सोशल मीडिया साईटवरील भाजपाच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची पोस्ट करण्यात आली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा ‘एनपीए‘त गेली आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी कुठे? , असे लिहित भाजपाकडून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (Devendra Fadanvis : Thackeray group should not pretend to be moral; BJP’s response to Shiv Sena’s criticism)
हेही वाचा – “भाजपच्या नैतिकतेचं ऑडिट गरजेचं…”, नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी साधला निशाणा
भारतीय जनता पक्ष हा नैतिकतेचे फुगे फुगवत आहे ना छाती फुटेपर्यंत… त्यांच्याकडे नैतिकता थोडी तरी शिल्लक आहे का? म्हणून आज आम्ही म्हटले आहे की, यांच्या नैतिकतेचे ऑडिट केले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे ऑडिट होते. काय खरे काय खोटे कुठे काय… भारतीय जनता पक्षाचा नैतिकतेचे ऑडिट होणे गरजेचे आहे, असे म्हणत ठाकरे गटाने टीका केली. पण त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपाने लिहिले की, “उबाठाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपादक पोपटलाल यांनी त्यांच्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीचं ऑडिट केलं असतं तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा ‘एनपीए‘त गेली आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी कुठे?”
तर, या पोस्टच्या माध्यमातून नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतच्या भूमिका वेगवेगळ्या का आहेत, याबाबतची माहिती देखील भाजपाकडून देण्यात आली आहे. “नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ते जेलमध्ये गेले, सध्या वैद्यकीय कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला. पण प्रफुल्ल पटेल यांचं प्रकरण वेगळं आहे. त्यांच्यावर ना गुन्हा दाखल आहे, ना ते जामिनावर बाहेर आहेत. उद्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, तर जी भूमिका नवाब मलिक यांच्याबाबत, तीच प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत ही असती.” असे भाजपाकडून लिहिण्यात आले आहेत.
“उबाठा गटानं नैतिकतेचं ढोंग अजिबात रचू नये. नवाब मलिक तुरुंगात असून सुद्धा शेवटपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत तुम्ही दाखवली नव्हती. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. त्यामुळे ऑडिट करायचंच असेल तर तुमच्या अडीच वर्षाच्या काळातील नैतिकेतेचं करा. तो रिपोर्ट पाहून तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही.” असा उलट हल्लाबोलच भाजपाकडून ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे एकमेकांवर नैतिकतेच्या मुद्द्यावरून हल्ला करणाऱ्या ठाकरे गटात आणि भाजपात आणखी एका मुद्द्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे.
उबाठाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपादक पोपटलाल यांनी त्यांच्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीचं ऑडिट केलं असतं तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा ‘एनपीए‘त गेली आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी… pic.twitter.com/EepIALBSng— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 9, 2023