अहमदनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 17 व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळाने त्यांची गुरुवारी (14 सप्टेंबर) भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून फळांचे ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर चौंडी येथे सुरू असलेलं धनगर समाजाचेही उपोषण मिटण्याची चिन्हे होती. धनगर समाजातील अनेकांचा राग असूनही नगरचे पालकमंत्री विखे पाटील मध्यस्थी करण्यासाठी चौंडीला जाणार होते. त्यांचा दौराही ठरला मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी चापडगाव येथे राज्य सरकाराचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (Dhangar community angry as Vikhe Patils tour was canceled on time A symbolic effigy of the state government was burnt)
मराठा समाजानंतर यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. दोन आठवड्यानंतर सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा यशवंत सेनेकडून देण्यात आला होता.
या उपोषणास गेल्या नऊ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून पाठींबा वाढत आहे. याची सरकाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. तसेच गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू असल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालावत चालली आहे. दरम्यान, मराठा समाजानंतर आज चौंडी येथे सुरू असलेलं धनगर समाजाचेही उपोषण मिटण्याची चिन्हे होती. कारण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यां चौंडी येथील आंदोलकांना भेटण्यासाठी येणार असल्याचे कालच निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार आज सकाळी त्यांची चौंडीत प्रतीक्षा सुरू होती. मात्र सकाळी ऐनवेळी हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे आक्रमक झालेल्या धनगर समाजाच्या युवकांनी याचा निषेध करीत अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे राज्य सरकाराचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी राज्यसरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. राज्य सरकारने धनगर समाजाच्या उपोषणाची दखल न घेतल्यास, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी वटहुकुम काढावा न काढल्यास यापुढे महाराष्ट्र तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.